महाराष्ट्रात २०२६ च्या महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. या निकालांकडे जनतेने विकासाला दिलेला कौल म्हणून पाहिले पाहिजे, असे सांगत फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. “महापालिका निवडणुकांमध्ये जनतेने स्पष्टपणे विकास, पारदर्शकता आणि प्रामाणिक कारभारालाच पसंती दिली आहे. हा विजय कोण्या एका नेत्याचा नसून, रस्त्यावर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे,” असे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा :
महानगरपालिकांत धुरंधर भाजपाची कमाई १२३० जागांची
अरबी समुद्रातून नौकेसह नऊ पाकिस्तानी ताब्यात
टी२० विश्वचषकापूर्वी नेपाळचा मोठा डाव
पुणे–पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा पवारांना धक्का
ते पुढे म्हणाले की, “राज्यातील एकूण २९ महापालिकांपैकी तब्बल २५ महापालिकांमध्ये महायुती सत्तेत येण्याच्या दिशेने आहे. हे निकाल म्हणजे जनतेने आमच्या कामावर व्यक्त केलेला विश्वास आहे.” या यशामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासदृष्टीचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशभरात जे विकासाचे राजकारण सुरू आहे, त्यालाच महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पाठिंबा दिला आहे,” असे ते म्हणाले.
विजयानंतर कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना फडणवीस यांनी संयम राखण्याचे आवाहन केले. “विजयाचा उन्माद करू नका. ही सत्ता सेवा करण्यासाठी आहे, माज दाखवण्यासाठी नाही. जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरणे हीच खरी जबाबदारी आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये महायुतीचा झेंडा फडफडेल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले.
भाषणाच्या शेवटी फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत, “समावेशक विकास, सामाजिक न्याय आणि मजबूत स्थानिक स्वराज्य हीच आमची दिशा असेल,” असा निर्धार व्यक्त केला.
