“आंदोलनस्थळी दगडफेक करण्याच्या सूचना जरांगेंकडूनचं”

मनोज जरांगे यांचे सहकारी बाबूराव वाळेकर यांच्याकडून खळबळजनक खुलासा

“आंदोलनस्थळी दगडफेक करण्याच्या सूचना जरांगेंकडूनचं”

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर त्यांच्या सहकाऱ्यांकडून गंभीर आरोप होत असून यातून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सरकारने दिलेले स्वतंत्र आरक्षण अमान्य करून आंदोलन सुरू ठेवणाऱ्या मनोज जरांगे यांच्या विरोधात त्यांचेच मराठा सहकारी कार्यकर्ते समोर आले आहेत. मनोज जरांगे यांचे सहकारी बाबूराव वाळेकर यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविषयी काही दावे केले आहेत.

जरांगेंच्या पाठीशी शरद पवार, राजेश टोपेंचा हात

“मनोज जरांगे हे फ्रॉड असून मनोज जरागेंच्या आंदोलनाला शरद पवार आणि राजेश टोपेंनीच हात दिला आहे, हे १०० टक्के पुराव्यानिशी सांगत आहे,” असा दावा मनोज जरागेंचे जुने सहकारी बाबुराव वाळेकर यांनी केला आहे. तसेच अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक करण्यासही जरांगेंनी सांगितल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

स्वतःच्या प्रसिद्धीसाठी तरूणांचा कसा वापर करायचा याचा जरांगेंना चांगला अभ्यास

बाबुराव वाळेकर म्हणाले की, “मी जरांगे यांचा जुना सहकारी आहे. त्यांच्यासोबत १८ वर्षापासून काम केले आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी तरूणांचा कसा वापर करायचा याचा जरांगेंना चांगला अभ्यास आहे. हा माणूस समाजाची दिशाभूल करतो आहे. २०११ ला त्यांनी एक संघटना उघडली. त्या संघटनेत आपण होतो. कोपर्डी बलात्काराची घटना घडली त्यावेळी जरांगे यांनी एक बैठक घेतली. आम्हाला भावनिक करण्याचं काम केलं. पीडित मुलीला न्याय द्यायचा असं ते म्हणाले. त्या बैठकीला आम्ही १० ते १२ जण होतो. आरोपीवर हल्ला करायचा असं त्यांनी सांगितलं. मात्र, प्रत्यक्षात कृतीवेळी जरांगेंनी तिथून पळ काढला. मनोज जरांगेंनी आत्तापर्यंत १० ते १२ लोकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. आम्ही तुरुंगात गेलो आणि प्रसिद्धी यांनी मिळवली. पुरावे असून योग्य वेळ आली की उघड करेन,” असं आव्हान बाबूराव वाळेकर यांनी केलं आहे.

हे ही वाचा:

रशिया-युक्रेन युद्धात सुरतच्या तरुणाचा मृत्यू

प्रखर राष्ट्रभक्त, हिंदुत्व विचारांचे पुरस्कर्ते, क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमन

ठाकरे, शरद पवारांची स्क्रीप्ट जरांगे बोलत आहेत!

रांचीत टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

घटना घडल्या तर दगडफेक करू शकता- मनोज जरांगे

“दंगल व्हायच्या आधी त्यांच्या कार्यकर्त्यांनी येऊन सांगितलं की, जरांगे पाटलांनी मेसेज दिला आहे की, इथे जर अशा घटना घडल्या तर तुम्ही सरळ सरळ दगडफेक करू शकता. जरांगे यांनी महिलांना सुद्धा ढाल बनवले, महिला सुद्धा बोलवून घेतल्या आणि स्वतःला कडा बसवून घेतला. ज्या महिलांना पोलिसांचा मार बसला आहे त्याला जरांगे पाटील जबाबदार आहेत,” असल्याचा आरोप वाळेकर यांनी जरांगेंवर केला आहे.

Exit mobile version