“के सुरेश यांना नामनिर्देशित करणं हा काँग्रेसचा एकतर्फी निर्णय”

अध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारीवरून तृणमूल काँग्रेसने व्यक्त केली नाराजी

“के सुरेश यांना नामनिर्देशित करणं हा काँग्रेसचा एकतर्फी निर्णय”

लोकसभेच्या सभापतीपदासाठी देशात पहिल्यांदा निवडणूक पार पडणार आहेत. सभापती पदासाठी एनडीएकडून ओम बिर्ला उभे राहिले आहेत तर विरोधकांकडून के सुरेश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार के सुरेश हे काँग्रेस असून इंडी आघाडीकडून त्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, तृणमूल काँग्रेसकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांमधील नाराजी आता उघडपणे दिसत असल्याची चर्चा आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी मंगळवारी के सुरेश यांना लोकसभा अध्यक्ष पदासाठी दिलेल्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली आहे. खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, लोकसभा अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून के सुरेश यांना नामनिर्देशित करण्यापूर्वी काँग्रेसने त्यांच्या पक्षाशी सल्लामसलत केली नव्हती. खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “याबाबत आमच्याशी संपर्क साधला गेला नाही, कोणतीही चर्चा झाली नाही. दुर्दैवाने हा एकतर्फी निर्णय आहे,” अशी जाहीर नाराजी अभिषेक बॅनर्जी यांनी बोलून दाखवली. संसदेबाहेर काँग्रेसच्या निर्णयाबाबत विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा:

संसदेत शपथ घेतल्यानंतर ओवैसींनी लगावले ‘जय पॅलेस्टाईन’चे नारे!

केजरीवालांचा मुक्काम तिहारमध्येचं; जामीन देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द!

पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

२०५० पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल!

भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने इंडी आघाडीतील नेत्यांना ओम बिर्ला यांच्या नावाला पाठींबा देण्यासाठी सुचवले होते. मात्र, याला इंडी आघाडीकडून विरोध करण्यात आला. अध्यक्षपदावर एकमत आणण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल आणि द्रमुकचे टीआर बालू यांची कार्यालयात भेट घेतली. मात्र, उपसभापतीपदाची ऑफर न देता बिर्ला यांना पाठिंबा देण्यास नकार देत विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या कार्यालयातून सभात्याग केला. यानंतर आता बुधवारी सकाळी ११ वाजता सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. कनिष्ठ सभागृहात एनडीएचे बहुमत आहे आणि ओम बिर्ला यांना सभापतीपदी निवडून आणण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे चित्र आहे. ओम बिर्ला यांना निवडणूक जिंकण्यासाठी २७१ मतांची गरज आहे. एनडीएचे लोकसभेत २९३ सदस्य आहेत तर इंडी आघाडीचे २३३ सदस्य आहेत.

Exit mobile version