ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर चिखल-बूटफेक?

बॅनर्जींच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांचा घेराव

ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर चिखल-बूटफेक?

पश्चिम बंगालच्या कांचरापाडा येथे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी येथे पोहोचल्या असताना भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केला. यावेळी त्यांच्या वाहनावर चिखल आणि बूट फेकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

ममता बॅनर्जी ज्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी गेल्या होत्या, त्या प्रकरणाला पोलीस कोठडीतील मृत्यूची पार्श्वभूमी आहे. हालीशहर पोलिसांनी एका व्यक्तीला खंडणीसह काही आरोपांप्रकरणी अटक केली होती. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर मारहाणीचा गंभीर आरोप केला. या घटनेची माहिती घेण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी कुटुंबीयांची भेट घेतली.
हे ही वाचा:
चांदीपुरा विषाणूचा गुजरातमध्ये कहर; मुंबईत बीएमसी अलर्टवर

भारतीय संघाला दिलासा, शुभमन गिलने सुरू केला सराव

काकोरी दरोडा नव्हता, ती तर स्वातंत्र्यासाठीची क्रांतिकारकांची ‘ट्रेन कारवाई’

अरुण पन्नालाल नावाच्या ख्रिश्चन व्यक्तीने केली शिवलिंगाची बदनामी

ममता बॅनर्जी यांच्या भेटीच्या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांकडून ‘चोर-चोर’ अशा घोषणा देण्यात आल्याचे वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, विरोधकांच्या आंदोलनादरम्यान ममता बॅनर्जी यांच्या वाहनावर चिखल आणि बूट फेकण्यात आल्याने राजकीय वातावरण आणखी तापले.

या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या वाहनावर विटाही फेकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारच्या हल्ल्यात आपल्या डोक्याला दुखापत होऊन जीवही जाऊ शकला असता, असे त्यांनी म्हटले. पोलिसांनी आंदोलकांवर योग्य कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

या घटनेवरून तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करत सरकारवर निशाणा साधला, तर भाजपकडून त्यांच्या दौऱ्याच्या उद्देशावरच प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यामुळे कांचरापाडा येथील या घटनेने पश्चिम बंगालमधील आधीच तापलेल्या राजकीय वातावरणाला आणखी धार आली आहे.

Exit mobile version