‘मध’ उत्पादनात नवा विक्रम; ११ वर्षांत उत्पादन दीड लाख मेट्रिक टनांवर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये घेतली दखल

‘मध’ उत्पादनात नवा विक्रम; ११ वर्षांत उत्पादन दीड लाख मेट्रिक टनांवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या १२८ व्या भागात वंदे मातरमच्या १५० वर्षांपासून ते डेस्टिनेशन वेडिंगद्वारे पर्यटनाला चालना, राम मंदिराच्या धर्मध्वजेबद्दल, रामबन ‘सुलाई मध’ आणि देशभरातील वेगवेगळ्या भागात तयार होणाऱ्या मधाविषयी चर्चा केली. यावेळी त्यांनी देशातील मध उत्पादनाला ‘मधु क्रांती’ असे नाव दिले.

कार्यक्रमात त्यांनी म्हटले की,  भारत मध उत्पादनात नवे विक्रम करत आहे. आज देशातील अनेक राज्यांत विविध गुणधर्मांनी संपन्न असा मध तयार केला जात आहे. ११ वर्षांपूर्वी देशात फक्त ७६हजार मेट्रिक टन मध तयार होत होता, तो आता वाढून दीड लाख मेट्रिक टनांवर पोहोचला आहे. कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध मिशन’ अंतर्गत बी-बॉक्सचे वितरण करण्यात आले असून त्यामुळे लोकांना रोजगारही मिळाला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी विविध राज्यांची संस्कृती, परंपरा आणि नैसर्गिक संपदा कशी एकत्रितपणे मध उत्पादनाला हातभार लावते, याचा उल्लेख केला. त्यांनी जम्मू-कश्मीरच्या रामबनमध्ये तयार होणाऱ्या मधाविषयी, दक्षिण भारतातील पुत्तूरमधील वनस्पतीजन्य मधाविषयी, कर्नाटकच्या टुमकूरमधील मधाविषयी आणि नागालँडमधील ‘क्लीफ हनी हंटिंग’ पद्धतीबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की प्रत्येक प्रदेशातील मध त्याच्या परंपरेची आणि निसर्गाची वेगळीच गोडी घेऊन येतो.

जम्मू-कश्मीरच्या रामबन भागातील मधाबद्दल ते म्हणाले की, येथे ‘सुलाई’ या वनस्पतीच्या पांढऱ्या फुलांपासून मध तयार होतो. खास म्हणजे हा मध पांढऱ्या रंगाचा असतो आणि त्याला जीआय टॅगही मिळाला आहे, ज्यामुळे त्याची देशभरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

हे ही वाचा:

हर्ष फायरिंगमध्ये लग्नात वराचा मृत्यू

देशातील इलेक्ट्रॉनिक्स, आयटी उद्योग बजावणार मोठी भूमिका

रशियाने सुदूर पूर्वेत शोधले चांदीचे दोन मोठे साठे

जीडीपी वाढीवरून एनडीएमध्ये फिलगुड

दक्षिण भारतातील पुत्तूर येथे तयार होणाऱ्या मधाबद्दल ते म्हणाले की येथील वनस्पती मध निर्मितीसाठी अत्यंत उत्कृष्ट समजल्या जातात. येथे तयार होणारा मध आता ‘ब्रँड’ बनला असून शहरांमध्ये विकला जातो आणि यामुळे हजारो ग्रामीण शेतकऱ्यांना रोजगार मिळाला आहे.

नागालँडच्या ‘क्लीफ हनी हंटिंग’बद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की देशातील ही मध निर्मितीची सर्वात धोकादायक पद्धत आहे. येथे मधुमक्षिका खडकाळ उंच पर्वतावर पोळे तयार करतात आणि शेतकरी अत्यंत धाडसाने या कड्यावर चढून मध मिळवतात.

 

Exit mobile version