२०२६ च्या जागतिक जीडीपी योगदानाच्या अंदाजात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशा जागतिक सांख्यिकी अहवालावर टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मस्क यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आणि सरकारवर टीका करताना भारताचा अपमान करू नका असे आवाहन केले.
उद्योगपती मस्क यांनी लिहिले होते की, “सत्तेचे संतुलन बदलत आहे.” मस्क यांनी stats feed ची एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये दावा केला होता की चीन आणि भारत एकत्रितपणे जागतिक वाढीच्या ४३.६% योगदान देतात. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अर्थव्यवस्थेच्या हाताळणीवर राहुल गांधी यांनी सतत टीका केली आहे, ज्यामध्ये त्यांनी “मृत अर्थव्यवस्थे”बद्दल केलेल्या वक्तव्याचा पुनरुच्चार आणि २०२६- २७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर नवीन आक्षेपांचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्री रिजिजू म्हणाले की, “मी सहसा अशा विधानांवर प्रतिक्रिया देत नाही जे विधान भारतीयांनी केलेले नाही. मी मास्क यांच्या विधानाचा संदर्भ फक्त राहुल गांधींना संवेदनशील करण्यासाठी देत आहे की, सरकारवर टीका करणे हा लोकशाही अधिकार असला तरी, भारताचा अपमान करू नका आणि भारताच्या कामगिरीला कधीही कमी लेखू नका. अभिमानी भारतीय बना,” अशी रिजिजू यांनी पोस्ट केली आहे.
एलोन मस्क यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये २०२६ मध्ये जागतिक जीडीपी वाढीतील टॉप १० देशांची आणि त्यांच्या अंदाजित योगदानाची यादी देण्यात आली आहे, ज्यामध्ये आयएमएफच्या आकडेवारीचा हवाला देण्यात आला आहे. असे म्हटले आहे की एकूण जागतिक वाढीमध्ये आशिया- पॅसिफिक प्रदेशाचा वाटा सुमारे ५०% आहे. या यादीत भारताचा जीडीपी योगदानाचा अंदाज १७% असून तो अमेरिकेपेक्षा वरचा आहे. इंडोनेशिया, अमेरिका, चीन आणि जर्मनी सारखे इतर देश अनुक्रमे ३.८%, ९.९%, २६.६% आणि ०.९% आहेत. जानेवारीमध्ये, आयएमएफने २०२५- २६ या आर्थिक वर्षासाठी भारताचा विकासदर ७.३ टक्के आणि २०२६- २७ या आर्थिक वर्षासाठी देशाच्या जीडीपी वाढीचा अंदाज ६.४ टक्के केला होता.
हे ही वाचा:
“विश्वचषक खेळणार पण, भारतविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार”
बलुच बंडखोरांकडून दोन महिला आत्मघातकी हल्लेखोरांचे फोटो प्रसिद्ध
साधेपणाच्या वर्खाआड दडलेली तीक्ष्ण बुद्धीमत्ता
अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेला प्राधान्य
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर वारंवार टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर रिजिजू यांचे हे विधान आले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या “मृत अर्थव्यवस्था” या वक्तव्यावरील प्रश्नाला उत्तर देताना गांधी यांनी ट्रम्प यांच्या विधानाचे समर्थन केले होते आणि अर्थव्यवस्थेच्या हाताळणीबद्दल भाजपवर टीका केली होती.
