उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर विशेष मतदारयादी पुननिरीक्षण (एसआरए) प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाकडून राज्याच्या मसुदा मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण मतदारसंख्या जवळपास १५ कोटींवरून सुमारे १२ कोटींवर आली असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली.
उत्तर प्रदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नावे वगळण्यामागे विविध कारणे नमूद करण्यात आली आहेत. यामध्ये सुमारे ४६.२३ लाख मतदार मृत असल्याचे आढळले, २.१७ कोटी मतदार स्थलांतरित झाले होते, तर २५.४७ लाख मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदलेली असल्याचे निदर्शनास आले.
हे ही वाचा :
इंटेलची ‘कोर अल्ट्रा सिरीज ३’ प्रोसेसरची घोषणा
अमेरिका–व्हेनेझुएला तणावाचे जागतिक पडसाद
मुंबईत रविवारी तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक
या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य लाभले असून, बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी (बीएलओ) क्षेत्रीय तपासणी पूर्ण केल्याचेही सीईओंनी स्पष्ट केले. मसुदा एसआयआर टप्प्यात देशभरात सर्वाधिक नावे वगळली गेलेले राज्य म्हणून उत्तर प्रदेश पुढे आले आहे. तुलनेत, तमिळनाडूमध्ये सुमारे १५ टक्के, तर गुजरातमध्ये १४.५ टक्के नावे वगळण्यात आली आहेत; उत्तर प्रदेशात हा आकडा १८.७ टक्के आहे.
मसुदा मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत ६ फेब्रुवारीपर्यंत खुली करण्यात आली आहे. ज्या मतदारांचे मॅपिंग अपूर्ण आहे, त्यांना नोटीस दिली जाणार आहे. राज्यात आतापर्यंत ९१ टक्क्यांहून अधिक मतदार मॅपिंग पूर्ण झाली असल्याची माहिती देखील राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
