पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या १३०व्या भागातून देशवासीयांना संबोधित केले. २०२६ मधील पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा हा पहिला भाग होता.
देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतातील लोक अत्यंत नाविन्यपूर्ण आहेत आणि ते आपल्या समस्यांवर स्वतःच उपाय शोधतात. त्यांनी उत्तर प्रदेशातील आजमगढ आणि आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात स्थानिक नागरिकांनी राबवलेल्या पर्यावरण संरक्षणाच्या यशस्वी उपक्रमांचा उल्लेख करत जनसहभागाच्या ताकदीवर भर दिला.
पंतप्रधानांनी तमसा नदीच्या पुनरुज्जीवनाची कथा सांगितली. अयोध्येतून उगम पावून गंगेत मिळणारी तमसा नदी कधी काळी स्थानिक जनजीवनाची केंद्रबिंदू होती. मात्र प्रदूषणामुळे तिचा प्रवाह थांबला होता. त्यानंतर आजमगढच्या नागरिकांनी एकत्र येत नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली, नदीच्या काठावर वृक्षलागवड केली आणि तमसा नदीला पुन्हा नवे जीवन दिले.
हे ही वाचा:
ट्रम्पवादळानंतर अमेरिकेत हिमवादळ; १३ हजार उड्डाणे रद्द
बांगलादेशात हिंदू तरुणाला गॅरेजमध्ये जिवंत जाळले
अवेळी म्हातारपण येऊ नये असं वाटतंय, मग खा आवळा…
नोवाक जोकोविचचा ४०० वा ग्रॅण्ड स्लॅम सामना
त्याचप्रमाणे, आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्हा दीर्घकाळ दुष्काळाच्या समस्येने त्रस्त होता. येथे ‘अनंत नीरु संकल्प प्रकल्पा’अंतर्गत स्थानिक नागरिकांनी सुमारे १० जलाशयांची स्वच्छता करून त्यांचे पुनरुज्जीवन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, या उपक्रमांमुळे केवळ जलसंवर्धनच झाले नाही, तर हरित क्षेत्रातही वाढ झाली आणि संपूर्ण पर्यावरणीय प्रणाली अधिक सशक्त झाली. आजमगढ असो वा अनंतपूर, नागरिक एकत्र येऊन संकल्प घेतात, हे पाहून आनंद वाटतो. हीच आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे, असे त्यांनी नमूद केले. अशा छोट्या-छोट्या उपक्रमांतून मोठे बदल घडून येतात आणि पर्यावरण संरक्षणात जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, यावर त्यांनी भर दिला.
पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितले की, भारतीय संस्कृती आणि सण-उत्सव जगभर आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. जगाच्या विविध भागांत भारताचे सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जात आहेत. देशवासी जिथे कुठे असतील, तिथे ते आपल्या संस्कृतीची मूलभूत भावना जपत आहेत आणि पुढील पिढीपर्यंत ती पोहोचवत आहेत.
पंतप्रधानांनी सांगितले की, मलेशियामध्ये ५००पेक्षा अधिक तमिळ शाळा कार्यरत आहेत, हे जाणून अनेकांना सुखद आश्चर्य वाटेल. या शाळांमध्ये तमिळ भाषेतून शिक्षण दिले जाते आणि इतर विषयही तमिळ भाषेत शिकवले जातात. याशिवाय तेलुगू, पंजाबी यांसारख्या इतर भारतीय भाषांवरही येथे विशेष भर दिला जात आहे.
