पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील ‘सेवा तीर्थ’ या नव्या प्रशासकीय संकुलातून अधिकृतपणे कामकाज सुरू केले. यापूर्वी पंतप्रधानांचे कार्यालय साउथ ब्लॉक येथे कार्यरत होते. स्वातंत्र्यानंतर सुमारे सात दशकांपासून साउथ ब्लॉकमध्येच पंतप्रधान कार्यालय होते; मात्र आता ते नवीन पत्त्यावर स्थलांतरित झाले आहे. नव्या इमारतीतील पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) मधूनच मोदी यांनी पहिल्याच दिवशी काही महत्त्वाच्या निर्णयांवर स्वाक्षऱ्या केल्या.
‘सेवा तीर्थ’ हे नाव सरकारच्या ‘सेवा, सुशासन आणि समर्पण’ या भावनेवर आधारित आहे. या आधुनिक इमारतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान, अधिक मजबूत सुरक्षा व्यवस्था आणि विविध विभाग एकत्र काम करू शकतील अशी सोय करण्यात आली आहे. यामुळे निर्णय प्रक्रियेला गती मिळेल आणि मंत्रालयांमधील समन्वय सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
आता पंतप्रधान कार्यालय नाही, सेवा तीर्थ…
अमेरिकेचा सर्वात मोठे विमानवाहू जहाज इराणकडे रवाना
सोने व चांदीच्या किंमतीत थोडी वाढ
AI च्या वाढत्या प्रभावाचा बाजाराला फटका
नव्या कार्यालयातून काम सुरू करताच पंतप्रधानांनी सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतले. रस्ते अपघातातील जखमींना तातडीने मदत मिळावी यासाठी ‘प्रधानमंत्री राहत योजना’ अंतर्गत अपघातग्रस्तांना ठराविक रकमेपर्यंत कॅशलेस उपचार देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे अपघातानंतर उपचारासाठी होणारा आर्थिक ताण कमी होण्याची शक्यता आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या ‘लखपती दीदी’ योजनेचा विस्तार करण्याचाही निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागातील अधिकाधिक महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लाभार्थींचे लक्ष्य वाढवण्यात आले आहे. या उपक्रमामुळे महिलांचे आर्थिक सबलीकरण अधिक मजबूत होईल, असा सरकारचा दावा आहे.
याशिवाय शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली. कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया उद्योग आणि साठवण प्रकल्पांना चालना मिळावी हा या निर्णयामागचा उद्देश आहे. तसेच नवउद्योजक आणि स्टार्टअप क्षेत्राला बळ देण्यासाठी निधी वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
सरकारच्या मते, ‘सेवा तीर्थ’मधून सुरू झालेले हे नवे पर्व अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक आहे. साउथ ब्लॉकचा ऐतिहासिक वारसा जपत, आता नव्या इमारतीतून देशाच्या विकासाला अधिक वेग देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
