पक्षाला आता गरज उरलेली नाही म्हणत प्रकाश महाजनांचा मनसेला जय महाराष्ट्र!

प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा दिला राजीनामा

पक्षाला आता गरज उरलेली नाही म्हणत प्रकाश महाजनांचा मनसेला जय महाराष्ट्र!

महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म्हणजेच मनसेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षांतर्गत नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसेच ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात होते. अखेर त्यांनी आता अधिकृतरीत्या मनसेच्या प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला धक्का बसल्याचे मानले जात आहे.

प्रकाश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सामान्य प्रवक्ता म्हणून पक्षात होतो आणि दिलेली जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडली. गेल्या काही दिवसांपासून वाटत होते की, कुठेतरी थांबावे. त्यामुळे हा निर्णय घेतला. पक्षात फारशी गरज राहिली नाही. अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाट्याला आली. क्षमता असूनही योग्य काम मिळाले नाही. सन्मान मिळाला नाही. सन्मान आणि काम या कमीतकमी अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही आणि एवढा तणाव नको वाटला. दोन भाऊ एकत्र आल्याचे पाहिले आता आपलं काम संपलं, असं म्हणत प्रकाश महाजन यानी नाराजी व्यक्त केली आहे.

पक्ष संघटनेत जबाबदारी मिळेल अशी अपेक्षा होती पण, असं कधी घडलं नाही. ११ जुलैनंतर लक्षात आलं की पक्षाला आपली फार गरज राहिलेली नाही. दोन महिने सकारात्मक काही घडण्याची वाट पाहिली पण, दखलही घेण्यात आली नाही. दरवाजापर्यंत आणून सोडल्यानंतर तिथेचं उभे राहायचे की बाहेर पडायचे हा निर्णय होता, असेही प्रकाश महाजन म्हणाले.

हे ही वाचा : 

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्यांवर कर लावा

भोपाळमधील ‘लव्ह जिहाद’ प्रकरण; आरोपी साद आणि साहिलच्या घरावर बुलडोझर!

पॅलेस्टाईनला राज्याचा दर्जा देण्यासाठी भारतासह १४१ देशांचा पाठींबा

रशियातील कामचटकामध्ये जोरदार भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी!

नारायण राणे यांच्या विरोधात दंड थोपटल्याने हे घडले असे विचारण्यात आल्यावर प्रकाश महाजन यानी नाराजी व्यक्त करत म्हटले की, जखमेवरची खपली काढू नका. दोन भावांनी एकत्र यावे ही भूमिका जाहीर मांडली त्याचेही बोल ऐकावे लागले. आज दोन्ही भाऊ एकत्र आहेत आणि ही आनंदाची बाब आहे. एखादी व्यक्ती मनातून पूर्णपणे काढू शकत नाही त्यापैकी एक राज ठाकरे आहेत, अशा भावना प्रकाश महाजन यांनी व्यक्त केल्या आहेत. प्रकाश महाजन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच ते पक्षामध्ये होते. मराठवाड्यातील मनसेचा प्रमुख नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. मनसेचा ते बुलंद आवाज होते. अनेक चर्चांमध्ये ते मनसेचा मुद्दा लावून धरायचे.

Exit mobile version