अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचे गंभीर सवाल

पत्रकार परिषदेतून केली सखोल चौकशीची मागणी

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचे गंभीर सवाल

बारामतीजवळ झालेल्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतरही अनेक बाबी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. हा अपघात केवळ तांत्रिक चूक नसून त्यामागे गंभीर दुर्लक्ष किंवा अन्य कारणे दडलेली असू शकतात, असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला.

रोहित पवार यांनी सांगितले की, अजित पवार सुरुवातीला बारामतीला कारने जाणार होते. मात्र ऐनवेळी एका फाईलवर सही करण्यासाठी आग्रह करण्यात आल्याने त्यांचा प्रवासाचा निर्णय बदलला आणि विमानाने जाणे निश्चित झाले. हा प्लॅन नेमका कोणाच्या सांगण्यावरून बदलण्यात आला, हा पहिला महत्त्वाचा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अपघातग्रस्त विमानाचा पायलट आणि को-पायलट शेवटच्या क्षणी का बदलण्यात आले, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

अपघाताच्या वेळी विमानाने ‘गो-अराउंड’ का घेतला नाही, इंधन वाचवण्यासाठी पायलटवर कोणताही दबाव होता का, यावरही रोहित पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विमान खाली येताना एका बाजूला झुकल्याचे दृश्य समोर आले असून, हे तांत्रिक बिघाडामुळे झाले की अन्य कारणामुळे, याचा खुलासा होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

विमानाच्या सुरक्षिततेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, टेक-ऑफपूर्वी विमानाची सखोल तपासणी झाली होती का, एअरवर्थीनेस आणि टेक-लॉगचे अहवाल कुठे आहेत, याची माहिती अद्याप दिली गेलेली नाही. विमानाचे नियमित तसेच ‘हेव्ही मेंटेनन्स’ वेळेवर झाले होते का, त्याची जबाबदारी कोणाची होती, हँगरमधील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे का, हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत.
हे ही वाचा:
आता यूपीआयद्वारे पीएफ पैसे काढण्याची सुविधा

विदिशा येथे १००० वर्षे जुन्या मंदिरातील विष्णू मूर्तीची विटंबना

गोवा विशेष: राज्याची संस्कृती डिजिटल होणार!

बांगलादेशात निवडणुकीपूर्वी हिंदू व्यापाऱ्याची हत्या

रोहित पवार यांनी यावेळी संबंधित विमान कंपनीवरही गंभीर आरोप केले. युरोपमध्ये ज्या कंपनीच्या विमानांवर बंदी आहे, त्याच कंपनीचे विमान भारतात कसे उड्डाण करत होते, याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच याच कंपनीच्या विमानाचा यापूर्वीही अपघात झाला होता, मात्र त्याचा अहवाल आजपर्यंत सार्वजनिक का करण्यात आला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पायलटच्या पार्श्वभूमीवरही प्रश्न उपस्थित केले. संबंधित पायलटवर यापूर्वी निलंबनाची कारवाई झाली होती, तरीही अशा पायलटला व्हीआयपी उड्डाणासाठी परवानगी कशी देण्यात आली, याबाबत स्पष्टता हवी, अशी मागणी त्यांनी केली. विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टीम आणि इतर सुरक्षा अलर्ट कार्यरत होते का, हे तपासणेही अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी या अपघाताची निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. “हा अपघात केवळ एका व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण राज्यासाठी धक्का देणारा आहे. त्यामुळे सत्य समोर येणे आणि जबाबदारांवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे,” असे सांगत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

Exit mobile version