शशी थरूर काँग्रेसच्या बैठकीला दांडी मारणार

कोचीतील महापंचायत कार्यक्रमात कथित अपमान

शशी थरूर काँग्रेसच्या बैठकीला दांडी मारणार

केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अंतर्गत तणाव वाढल्याचे संकेत मिळाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांनी पक्षाच्या हायकमांडने बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोची येथे झालेल्या महापंचायत कार्यक्रमात आपला अपमान झाल्याची भावना निर्माण झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.

ही महापंचायत कोची येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. मात्र, कार्यक्रमातील आसनव्यवस्था, भाषणाचा क्रम आणि नियोजनातील गोंधळामुळे शशी थरूर नाराज झाल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला थरूर यांना सांगण्यात आले होते की त्यांच्या भाषणानंतर फक्त राहुल गांधीच भाषण करतील. मात्र नंतर राहुल गांधी आल्यानंतर इतर अनेक नेत्यांनीही भाषण केले, ज्यामुळे ठरलेला प्रोटोकॉल पाळला गेला नाही, अशी थरूर यांची भावना होती.

हे ही वाचा:

२२ जानेवारी २०२६: आजचे राशीभविष्य आणि शुभ अंक

सिल्व्हर ETF म्हणजे काय? गुंतवणूकदारांसाठी संधी, धोके आणि भविष्यातील चित्र

ट्रम्प यांच्या ‘शांतता मंडळा’त सामील होण्यावरून पाकमध्ये गदारोळ

चीनचा ट्रम्प यांच्या ‘शांतता मंडळा’त सहभागी होण्यास नकार!

याशिवाय, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात शशी थरूर यांचा थेट उल्लेख न केल्यानेही नाराजी वाढल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केरळमधील काँग्रेसमधील एक प्रमुख चेहरा असलेल्या थरूर यांचा उल्लेख न होणे अनेकांना आश्चर्यकारक वाटले.

या घटनेनंतर शशी थरूर यांनी आपल्या निकटवर्तीय सहकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त करताना, पक्षात आपल्या योगदानाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना बोलून दाखवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ते सध्या काँग्रेसच्या राज्य व केंद्रीय नेतृत्वावर दोन्हीवर नाराज आहेत.

थरूर यांच्या या निर्णयामुळे केरळ निवडणुकांपूर्वी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. पक्षातील शिस्त, वरिष्ठ नेत्यांचा सन्मान आणि कार्यक्रम व्यवस्थापनावरून कार्यकर्त्यांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, शशी थरूर हायकमांडच्या बैठकीला उपस्थित राहणार नसले तरी आज केरळ लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये ते सहभागी होणार आहेत. या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

ही घटना काँग्रेससाठी निवडणुकांच्या तोंडावर अस्वस्थता निर्माण करणारी ठरत असून, आगामी काळात पक्ष नेतृत्व या मतभेदांवर कसे तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version