महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या दोन्ही मुलांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच दिल्लीत पोहोचलेल्या सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान मोदींसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. या भेटीत कुटुंबीय आणि पक्षातील वरिष्ठ नेतेही सहभागी होते.
सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भेटीचे छायाचित्र शेअर करत, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली,” असे नमूद केले. तसेच, “महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची संधी मिळाली,” अशी माहिती त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’वर लिहिले की, “महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढणे सोपे नाही. मात्र जनकल्याण आणि राज्याच्या विकासासाठी त्यांनी आखून दिलेला दृष्टिकोन पूर्ण करणे हे आपले सामायिक कर्तव्य आहे. त्यासाठी तुमचा निर्धार निश्चितच महत्त्वाचा ठरेल.”
यापूर्वी १० फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी निष्ठा आणि समर्पणाने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. पती अजित पवार यांच्या अपघाती निधनांनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाल यांसह अन्य मंत्री उपस्थित होते.
हेही वाचा :
आर. अश्विन उस्मान तारिकच्या समर्थनार्थ
सणसणीत हेडिंग पर्याय: “यू-टर्न स्पेशलिस्ट!”
राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंग प्रस्ताव आणणार
भारत अमेरिका व्यापार करारात काही महत्त्वाचे बदल
३१ जानेवारी रोजी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, त्यांना क्रीडा व युवक कल्याण, उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक व्यवहार ही खाती देण्यात आली आहेत. मंगळवारी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत सहभाग घेतला.
भावनिक पोस्टमध्ये सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताना विश्वास, कर्तव्य आणि त्यागाची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी माननीय अजित दादांचे आयुष्यभराचे समर्पण माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करणे आणि शेतकरी, महिला, युवक व सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हीच माझी सर्वोच्च प्राथमिकता असेल.”
