उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पवार कुटुंबात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त समोर आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी या निर्णयाची आपल्याला काहीच कल्पना नाही, असे स्पष्ट केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरही त्यांनी भाष्य केले.
अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीची सकारात्मक चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. “अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा सुरू होती. मी या चर्चेत नव्हतो असे पवार यांनी स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती. याविषयीचा निर्णय १२ जानेवारीला जाहीर होणार होता. पण, आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेत खंड पडला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजित पवारांची इच्छा होती आणि आमचीही,” असे राज ठाकरे म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, “अजित पवारांचे जाणे हा प्रचंड मोठा आघात आहे. अजित गेली अनेक वर्षे संघटनेचे आणि सामान्य लोकांशी सुसंवाद ठेवून काम करणारा एक कर्तृत्ववान नेता होता. त्यांच्या दैनंदिन कामाची सुरुवात सहा वाजल्यापासून व्हायची. त्यांना पक्षाने, सरकारने, बारामतीकरांनी अखंड साथ दिली. या परिस्थितीला सामोरे जावे लागेल. त्याच्या कामाची पद्धत चालू ठेवावी लागेल. नवी पिढी या आव्हानांना सामोरी जाईल याची मला खात्री आहे.”
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर आणि पक्षाच्या नेतृत्वाबाबत त्यांच्या राष्ट्रवादी गटाकडून अत्यंत वेगाने निर्णय घेतले जात आहेत. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी झालेली निवड आणि त्यानंतर होणारा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी, यावर पत्रकारांनी विचारले असता शरद पवार म्हणाले, “सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची मला काहीच माहिती नाही. त्यांच्या पक्षाने तो निर्णय घेतलेला दिसतोय. हा पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे.” पुढे ते म्हणाले की, अशा चर्चा इथे होत नाही. ही चर्चा जी ऐकतोय ती मुंबईत झाली. सुनेत्रा पवार शपथ घेणार हे वाचनात आलं आहे. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. तो त्यांचा अधिकार आहे. शपथविधी आहे की नाही हे माहिती नाही. अजित पवार गेले म्हणून कुणीतरी पुढे यायला पाहिजे त्यातून पक्षाने निर्णय घेतलेला दिसतोय.
हे ही वाचा:
भारताला तेल खरेदीसाठी व्हेनेझुएलाची दारे पुन्हा खुली!
महमूद गझनी ‘परकीय आक्रमक नाही, तर हिंदुस्तानी लुटारू’
पाकिस्तानी कनेक्शन असलेल्या नार्को-नेटवर्कचा भांडाफोड
हिंदुस्तान एरोनॉटिक्स Dhruv-NG हेलिकॉप्टर्सची करणार निर्मिती; १,८०० कोटींची ऑर्डर
शरद पवार म्हणाले की, “जे गेले आहेत त्यांना परत आणले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी जबाबदारी घेण्यासाठी तयार होत असेल तर आत्मविश्वास मिळू शकतो. ते गेले म्हणून कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्यातून पक्षाने सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे देण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय,” असं शरद पवार यांनी स्पष्ट केले.
