शेवटची विकेट पडत नाही तोपर्यंत हार मानू नका!

माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांचा सल्ला

शेवटची विकेट पडत नाही तोपर्यंत हार मानू नका!

क्रिकेट सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत कधीही हार मानू नका, असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी  १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात सांगितले. चर्चगेट येथील ओव्हल मैदानात दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत बोलताना ते म्हणाले, कुठल्याही सामन्यात शेवटची विकेट पडत नाही तोपर्यंत सामन्यातील हार/जीत चा निर्णय होत नाही, त्यामुळे एक-दोन  चांगल्या भागीदारी देखील सामन्याचे चित्र पालटू शकतात. तुम्ही मुले मुंबईच्या आणि पर्यायाने भारतीय क्रिकेटचे भविष्य आहात, त्यामुळे भविष्यात अव्वल दर्जाच्या क्रिकेटमध्ये अधिक उंची गाठण्यासाठी आतापासूनच मानसिक परिपक्वता विकसित करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवेत. यावेळी मुंबईच्या १४ वर्षाखालील मुलांच्या निवड समितीचे चेअरमन श्रीधर मांडले, अझीम खान, मुंबईच्या रणजी ट्रॉफीचे निवड समिती सदस्य रवी ठाकर आणि ज्येष्ठ वृत्त छायाचित्रकार मोहन बने देखील उपस्थित होते.

दरम्यान अंतिम फेरीच्या लढतीत व्हिक्टरी क्रिकेट अकादमी संघाने ब्रावो क्रिकेट अकादमीवर ४२ धावांनी विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या व्हिक्टरी क्रिकेट अकादमीने ३३.१ षटकांत सर्वबाद २०३ धावांचे लक्ष्य उभारले. यात  कृषिव आडविलकर (४८), अरहाम छाजेड (२५) यांनी प्रमुख धावा केल्या. युवराज म्हात्रे याने २२/३ बळी, आदित्य कुमार याने १३/२ बळी  तर दिशांत फुलोरे ३३/२ बळी मिळविले.

हे ही वाचा:

काँग्रेसचा यू टर्न! ‘मारहाण’ करणाऱ्या पक्षांसोबत जुळवून घेण्याचे संकेत

“राष्ट्राच्या हितासाठी एकमेकांना सहकार्य करा!” शशी थरूर यांनी कोणाला दिला सल्ला?

हिंदू नसतील तर जगच नष्ट होईल!

अल्पसंख्याक दर्जा का काढून घेऊ नये….अल फलाहला नोटीस

या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रावो क्रिकेट अकादमी संघाला निर्धारित ३५ षटकांत ७ बाद १६१ धावाच करता आल्या. रेहान शर्मा (६६), युवराज म्हात्रे (२९) आणि सलमान खान (२६) यांनी उपयुक्त खेळी केल्या मात्र छोट्या-छोट्या भागीदारी रचून विजयाचे लक्ष्य गाठण्यात आणि अपेक्षित धावगती राखण्यात ते अपयशी ठरले.

अंतिम सामन्यात स्पर्श संगारे याची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम फलंदाज म्हणून क्रिकेट मंत्रा संघाचा शौर्य भानुशाली (१०९ धावा आणि ४ बळी) याला गौरविण्यात आले. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ब्रावो क्रिकेट अकादमीच्या मीत यादव (४ सामन्यात ९ बळी) आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून व्हिक्टरी क्रिकेट अकादमीच्या आरव दीक्षित (४ सामन्यात ६ झेल) यांना गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर,  मुंबईच्या १४ वर्षाखालील मुलांच्या निवड समितीचे चेअरमन श्रीधर मांडले, अझीम खान, मुंबईच्या रणजी ट्रॉफीचे निवड समिती सदस्य रवी ठाकर आणि जेष्ठ वृत्त छायाचित्रकार मोहन बने यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

व्हिक्टरी क्रिकेट अकादमी ३३.१ षटकांत सर्वबाद २०३ (कृषिव आडविलकर ४८,अरहाम छाजेड २५; आदित्य कुमार १३ धावांत २ बळी , युवराज म्हात्रे २२ धावांत ३ बळी, दिशांत फुलोरे ३३  वांत २ बळी) वि.वि. ब्रावो क्रिकेट अकादमी ३५ षटकांत ७ बाद १६१ (युवराज म्हात्रे २९, सलमान खान २६, रेहान शर्मा ६६; स्पर्श संगारे २१ धावांत २ बळी).

Exit mobile version