भारताचे माजी क्रिकेटपटू डब्ल्यू. व्ही. रमण यांचं मत आहे की, इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यान जसप्रीत बुमराह याच्यावर फारसा वर्कलोड टाकू नये आणि त्याने एका दिवसात जास्तीत जास्त १२ ओव्हरच टाकाव्यात.
भारतीय क्रिकेट मंडळाने आधीच स्पष्ट केलं आहे की बुमराह पाच कसोटींमध्ये केवळ तीन सामन्यांतच खेळणार आहे.
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कसोबतच्या विशेष चर्चेत रमण म्हणाले, “अद्याप भारताने बुमराह कोणत्या कसोटीत खेळणार हे ठरवलं नाही. बेकनहॅममधील इंट्रा-स्क्वॉड सामन्यानंतर चित्र स्पष्ट होईल. बुमराह भारतासाठी ‘की फॅक्टर’ आहे हे नक्की. त्यामुळे त्याला तीनच सामन्यांत खेळवणं निश्चित झालं, तर नियोजन थोडं सोपं होतं.”
ते पुढे म्हणाले, “बुमराहकडून एकाच दिवशी १५ ओव्हर पेक्षा अधिक काम करवू नये. मला वाटतं की त्याने एका दिवशी जास्तीत जास्त १२ ओव्हर टाकाव्यात.”
भारताकडून या दौऱ्यावर बुमराहसह मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह हे वेगवान गोलंदाज असून नीतीश रेड्डी आणि शार्दुल ठाकुर सीम-बॉलिंग अष्टपैलू आहेत.
रमण यांनी लीड्समध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी बुमराहशिवाय मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंह यांना गोलंदाजी आघाडीचा भाग बनवण्याचा सल्ला दिला.
त्यांनी पुढे म्हटलं, “हेडिंग्लेचं मैदान स्विंग आणि सीमसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे चार जलद गोलंदाज उतरवणं महत्त्वाचं ठरेल. जर बुमराह विश्रांतीवर असेल, तर शार्दुल ठाकूरकडे पर्याय म्हणून पाहावं लागेल.”
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका २० जूनपासून सुरू होणार आहे.
