आर्चरी एशिया कपमध्ये भारताच्या कंपाउंड तिरंदाजांनी शानदार कामगिरी करत आपला दबदबा सिद्ध केला. पुरुष वैयक्तिक, टीम, मिक्स्ड आणि महिला स्पर्धांमध्ये भारताने उत्कृष्ट प्रदर्शन करत एकूण १० पदकं पटकावली. यात २ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे.
पुरुषांच्या वैयक्तिक कंपाउंड अंतिम फेरीत उदय कांबोजने एशियन गेम्स पदक विजेता प्रथमेश जावकरचा १४५-१४४ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. तसेच रजत चौहानने थायलंडच्या पीरावत रत्नापोंगकियातला १४५-१४४ ने हरवत भारतासाठी ‘क्लीन स्वीप’ पूर्ण केला.
महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड स्पर्धेत तेजल साल्वेने मारिया डिमिडियुकवर १४४-१३५ अशी मात करत कांस्यपदक मिळवले.
मिक्स्ड टीम कंपाउंड स्पर्धेत—जी लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमध्ये प्रथमच समाविष्ट होणार आहे—भारताच्या चिकीता तानिपार्थी आणि रजत चौहान या जोडीने मलेशियाच्या जोडीला १५८-१५६ ने हरवत सुवर्णपदक जिंकले.
महिला कंपाउंड टीममध्ये चिकीता तानिपार्थी, राज कौर आणि तेजल साल्वे यांनी अंतिम फेरी गाठली, मात्र कझाकिस्तानविरुद्ध २२९-२२७ ने पराभव झाल्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
रिकर्व प्रकारातही भारताने दोन पदकं जिंकली. महिलांच्या वैयक्तिक अंतिम फेरीत रिधीला मंगोलियाच्या ओयुन-एर्डेन बासांडोर्जकडून ६-२ ने पराभव स्वीकारावा लागला आणि तिला रौप्यपदक मिळाले. तर पुरुषांच्या रिकर्व टीमला कझाकिस्तानविरुद्ध ५-४ अशी निसटती हार पत्करावी लागली आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
याआधी महिलांच्या रिकर्व टीमने मलेशियावर ५-१ ने विजय मिळवत कांस्यपदक जिंकले होते. तसेच पुरुषांच्या कंपाउंड टीमने भूटानला २३४-२३२ ने हरवत आणखी एक कांस्य पदक भारताच्या खात्यात जमा केले.
