अंडर-२० आशियाई अॅथलेटिक्समध्ये भारताचा सुवर्णझंकार!

अंडर-२० आशियाई अॅथलेटिक्समध्ये भारताचा सुवर्णझंकार!

आशियाई अंडर-२० अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत देशाचा झेंडा अभिमानाने फडकावला आहे. भारतीय संघाने तब्बल १० सुवर्ण, ५ रौप्य आणि ४ कांस्य अशी एकूण १९ पदके जिंकत स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. या शानदार यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन करत युवा खेळाडूंच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “२२ व्या आशियाई अंडर-२० अॅथलेटिक्स स्पर्धेत १० सुवर्णांसह १९ पदके जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन. ही कामगिरी आपल्या युवा खेळाडूंच्या दृढनिश्चयाची आणि उत्कृष्ट क्षमतेची साक्ष आहे. त्यांच्या यशातून देशातील आणखी अनेक तरुणांना खेळाकडे वळण्याची प्रेरणा मिळेल.”

अखेरच्या दिवशी सुवर्णमयी समाप्ती

स्पर्धेच्या अंतिम दिवशी भारतीय खेळाडूंनी आणखी ३ सुवर्णपदकांची भर घालत मोहिमेचा शानदार शेवट केला. पदकसंख्येच्या दृष्टीने हे भारताचे सर्वोत्तम यश नसले, तरी सुवर्णपदकांच्या बाबतीत भारतीय संघाने प्रभावी छाप पाडली. यापूर्वी २०२४ मध्ये दुबई येथे झालेल्या स्पर्धेत भारताने ७ सुवर्ण, ११ रौप्य आणि ११ कांस्य अशी एकूण २९ पदके जिंकली होती.

मुस्कानची सुवर्णधाव, निश्चयचा राष्ट्रीय विक्रम

महिलांच्या ५,००० मीटर शर्यतीत मुस्कानने १६ मिनिटे ५३.०८ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तर पुरुषांच्या डिस्कस थ्रो प्रकारात निश्चयने ६०.१० मीटर अंतरावर थाळी फेकून रौप्यपदक जिंकले. विशेष म्हणजे त्याने यासोबतच नवीन राष्ट्रीय अंडर-२० विक्रमही आपल्या नावावर केला.

पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीत मोगली वेंकटराम रेड्डीने १ मिनिट ४८.२७ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदकावर कब्जा केला आणि भारताच्या पदकसंख्येत मोलाची भर घातली.

महिला रिले संघाचा नवा स्पर्धा विक्रम

भारतीय महिला ४x४०० मीटर रिले संघाने शानदार धाव घेत सुवर्णपदक जिंकले आणि त्याचबरोबर नवा स्पर्धा विक्रमही प्रस्थापित केला. भारतीय संघाने ३ मिनिटे ३८.०७ सेकंद वेळ नोंदवला. याआधीचा ३ मिनिटे ३८.२० सेकंदांचा विक्रम २०१८ मध्ये जपानच्या संघाच्या नावावर होता.

या विजयी संघात नीरू पाठक, भूमिका संजय नेहाते, ताहुरा खातून आणि सहनूर बावा यांचा समावेश होता. त्यांच्या समन्वयपूर्ण आणि वेगवान धावण्याने भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.

पुरुष रिले संघानेही मोडला विक्रम

भारतीय पुरुष ४x४०० मीटर रिले संघाने देखील दमदार कामगिरी करत ३ मिनिटे ०५.५४ सेकंद वेळ नोंदवली. हा वेळ जुन्या ३ मिनिटे ०७.३८ सेकंदांच्या स्पर्धा विक्रमापेक्षा सरस होता. मात्र इतर संघांच्या अधिक वेगवान कामगिरीमुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

या संघात पीयूष राज, सैयद सबीर, रंजीत कुमार एस आणि मोहम्मद अशफाक यांचा समावेश होता.

महिला ४x१०० रिले संघाचे रौप्यपदक

भारतीय महिला ४x१०० मीटर रिले संघाने देखील उत्कृष्ट धाव घेत ४५.०५ सेकंदांत शर्यत पूर्ण केली आणि रौप्यपदक जिंकले. या संघात काजल हीराभाई वाजा, भावना, आरती आणि निपम यांचा समावेश होता.

युवा भारताची ताकद जगासमोर

आशियाई स्पर्धेत भारतीय युवा खेळाडूंनी केलेली ही कामगिरी केवळ पदकांपुरती मर्यादित नाही, तर ती भारतीय क्रीडाक्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा आश्वासक संदेश आहे. ट्रॅक असो किंवा फील्ड, भारताचे उद्याचे तारे आजच चमकू लागले आहेत. त्यांच्या या यशामुळे देशभरातील लाखो तरुणांना मोठी प्रेरणा मिळणार आहे

Exit mobile version