२०२७ एशियन शूटिंगचे यजमानपद भारताकडे

२०२७ एशियन शूटिंगचे यजमानपद भारताकडे

एशियन शूटिंग कॉन्फेडरेशनने जाहीर केले आहे की, भारत २०२७ साली एशियन रायफल आणि पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. या स्पर्धेतून लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ साठी एकूण आठ कोटा स्थानांची निवड होणार आहे.

ही स्पर्धा १ ते १० डिसेंबर २०२७ दरम्यान नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंज येथे पार पडणार आहे. नेशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

एशियन शूटिंग कॉन्फेडरेशनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. कारण याच स्पर्धेतून लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ साठी एशियातील आठ कोटा स्थानांची निवड होणार आहे.

भारताने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी झालेल्या पात्रता स्पर्धांमधून कमाल १६ कोटा स्थानं मिळवली होती. यामध्ये रायफल आणि पिस्तूल प्रकारात प्रत्येकी आठ-आठ कोटा स्थानांचा समावेश होता. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने विक्रमी २१ नेमबाजांना पाठवले होते, जे टोकियो ऑलिम्पिकमधील १५ नेमबाजांच्या तुलनेत लक्षणीय वाढ होती. भारतीय नेमबाजांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण तीन पदके जिंकली असून ती तिन्ही कांस्य पदके होती.

दरम्यान, सध्या दिल्ली येथे २ ते १४ फेब्रुवारीदरम्यान एशियन शूटिंग अजिंक्यपद स्पर्धा (रायफल/पिस्तूल) आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी भारताने ११८ खेळाडूंचा सर्वात मोठा संघ उतरवला आहे. कझाकस्तान ३५ खेळाडूंंसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कोरिया, इराण आणि जपान यांनीही मजबूत संघ पाठवले आहेत. याशिवाय चायनीज तैपेई, व्हिएतनाम आणि हाँगकाँगच्या नेमबाजांकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंज येथे होणाऱ्या या स्पर्धेत एकूण २० देश सहभागी होणार असून ३११ खेळाडू मैदानात उतरतील. त्यापैकी भारताच्या संघात ११८ खेळाडू असून तो एकूण संख्येच्या एक तृतीयांशपेक्षा अधिक आहे. कझाकस्तानचे ३५ आणि इराणचे २८ खेळाडू नोंदणीकृत आहेत.

एकूण या अजिंक्यपद स्पर्धेत ५६४ स्पर्धा प्रकार आयोजित करण्यात येणार आहेत.

Exit mobile version