ग्लासगोमधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंना रात्रीच्या जेवणासाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर हे रेस्टॉरंट वादाच्या भोवऱ्यात सापडले.
‘मिस्टर सिंह इंडिया–द होम ऑफ करी’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आलेल्या खेळाडूंना असे नॅपकिन देण्यात आले, ज्यावर भारताचा बाह्यरेषेचा नकाशा छापलेला होता. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन यांनी नकाशा पाहिला असता, त्यामध्ये देशाचा ईशान्य भाग पूर्णपणे दाखवण्यात आलेला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने नाराजी व्यक्त केली.
बोर्गोहेन यांनी आयएएनएसला सांगितले, “नॅपकिनवर तयार केलेल्या नकाशात आपला ईशान्य भाग नाही. भारताचा प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे आणि तो नकाशावर दाखवला गेला पाहिजे.”
बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (बीएफआय) अध्यक्ष अजय सिंह यांनी स्टार बॉक्सरचे समर्थन केले आणि कागदी नॅपकिनवर असलेल्या आणखी काही मोठ्या चुका दाखवून दिल्या. यामध्ये जम्मू-काश्मीरचा अपूर्ण नकाशा देखील समाविष्ट होता. सिंह यांनी रेस्टॉरंट व्यवस्थापनाला सांगितले की, त्यांनी तातडीने चुकीचे नॅपकिन हटवावेत आणि नकाशामध्ये सुधारणा करून त्यात भारताची संपूर्ण प्रादेशिक अखंडता दाखवावी. मात्र, या प्रकरणावर रेस्टॉरंटकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
हे ही वाचा:
केरळममध्ये पूर आणि भूस्खलनाचा भीषण कहर; आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू
इंडोनेशियात भीषण बोट दुर्घटना, ५ जणांचा मृत्यू, ४१ जण बेपत्ता
इंडिगोने हीथ्रो उड्डाणांवर लावला ब्रेक; बोईंग ७८७ सेवाही बंद
ग्लासगोमधील ‘मिस्टर सिंह इंडिया’ हे खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे अनेकदा क्रीडा संघ आणि मोठ्या व्यक्ती येत असतात. तीन दशकांहून अधिक काळापासून या रेस्टॉरंटने ग्लासगोमध्ये पंजाबी वारसा आणि स्कॉटिश भावनेच्या संगमातून तयार झालेली कौटुंबिक परंपरा जपली आहे.
सिंह कुटुंबाच्या चार पिढ्यांकडून चालवले जाणारे हे रेस्टॉरंट आपल्या खाद्यपदार्थ, पाहुणचार आणि समुदायाच्या माध्यमातून पंजाबी खाद्यपरंपरा आणि स्कॉटिश प्रभावाचा संगम सादर करते. त्यामुळे गेल्या तीन दशकांमध्ये या शहराला आकार देणाऱ्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचे दर्शन घडवणारा एक वेगळा खाद्यअनुभव येथे मिळतो.
ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या खेळाडूंनी एकूण ३९ पदके जिंकली आहेत. यावेळी भारताला १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्यपदके मिळाली आहेत. एकूण पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर राहिला आहे.
