भारताने पुरुषांच्या १९ वर्षांखालील वनडे क्रिकेट विश्वचषकावर सहाव्यांदा नाव कोरले. हरारे येथे ६ फेब्रुवारी रोजी झालेल्य अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करत एकतर्फी वर्चस्व गाजवले. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने प्रत्येकी १५ षटकार, चौकारांसह केलेल्या खणखणीत १७५ धावांमुळे भारताने ४११ धावा केल्या. त्याला इंग्लडकडे उत्तर नव्हते.
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथम फलंदाजी करत ९ बाद ४११ धावा केल्या. या डावाचा केंद्रबिंदू ठरला वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक १७५ धावांचा स्फोटक खेळ.
वैभव सूर्यवंशीने अवघ्या ५५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आणि प्रत्येकी १५ चौकार-षटकार लगावत अनेक विक्रम मोडले. तो स्पर्धेतील सर्वात कमी वयाचा शतकवीर ठरला तसेच १९ वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यातील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या त्याने नोंदवली. वैभवच सामन्यातील तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३११ धावांत सर्वबाद झाला. या विजयासह भारताने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात दणदणीत अंतिम विजयांपैकी एक नोंदवला.
कर्णधार आयुष म्हात्रेसोबत अवघ्या १९ षटकांत १४२ धावांची भक्कम भागीदारी रचत वैभव सूर्यवंशीने भारताचा पाया भक्कम केला. आयुष म्हात्रेने ५१ चेंडूंमध्ये संयमी ५३ धावा करत डाव सावरण्यात मोलाची भूमिका बजावली. सूर्यवंशी बाद झाल्यानंतर अभिज्ञान कुंदू, वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा आणि कनिष्क चौहान यांनी धावांचा वेग कायम राखला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी शेवटी थोडा प्रतिकार केला, तरीही भारताने ४०० धावांचा टप्पा सहज पार केला.
फाल्कनरचा एकाकी लढा निष्फळ
कॅलेब फाल्कनरने एकट्याने झुंज दिली आणि युवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज म्हणून विक्रम नोंदवला. मात्र अंतिम सामन्यातील ४१२ धावांचे प्रचंड लक्ष्य गाठण्यासाठी त्याची कामगिरी अपुरी ठरली.
४१२ धावांच्या पाठलागात इंग्लंडला कधीच स्थैर्य मिळाले नाही. सुरुवातीला आर. एस. अंब्रीश आणि हेनिल पटेल यांनी टाकलेल्या निर्धाव षटकांमुळे इंग्लंडवर त्वरित दबाव निर्माण झाला. जोसेफ मूर्सने हेनिलच्या गोलंदाजीवर तीन चौकार लगावत प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला, पण त्याचा टिकाव अल्पकाळच राहिला. लवकरच तो अंब्रीशच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि इंग्लंडची अवस्था १ बाद १९ अशी झाली, तीही अपेक्षित धावगतीपेक्षा खूप मागे.
बेन डॉकिन्स आणि बेन मेयेस यांनी थोडा प्रतिकार करत १० षटकांनंतर १ बाद ६४ अशी मजल मारली, पण ही भागीदारी फार काळ टिकली नाही. मेयेस रिव्हर्स शॉट मारण्याच्या प्रयत्नात खिलान पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला, त्यानंतर लगेच टॉम र्यूही तंबूत परतला. ३ बाद १४२ येथून इंग्लंडचा डाव झपाट्याने कोसळू लागला.
कर्णधार म्हात्रेने धोकादायक डॉकिन्सला बाद केले, धावचीत होण्याच्या गोंधळात आणखी एक विकेट पडली, आणि दीपेश देवेंद्रनने सलग दोन चेंडूंमध्ये दोन बळी घेत इंग्लंडला २२ षटकांत ७ बाद १७७ वर ढकलले. त्यानंतर निकाल औपचारिक ठरला आणि भारताने अखंड दबाव राखत ऐतिहासिक विजय निश्चित केला.
फाल्कनरने शेवटपर्यंत झुंज देत इंग्लंडसाठी आशेची एक क्षीण ठिणगी जिवंत ठेवली. त्याने आयुष म्हात्रेच्या ऑफ-स्पिनवर एक ड्राइव्ह केलेला चौकार आणि सरळ मैदानावर षटकार ठोकला. त्यानंतर देवेंद्रनच्या वेगवान गोलंदाजीवर एका षटकात चार चौकार लगावले, त्यापैकी तीन सलग चेंडूंवर. या आक्रमक खेळीच्या जोरावर त्याने अवघ्या २६ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि जेम्स मिंटोसोबत आठव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचत काही काळ भारताचा वेग रोखला.
