आयर्लंड टी-२० मालिका, इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका आणि त्यानंतर एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टीम मॅनेजमेंटवर टीकेची झोड उठू लागली आहे. भारताचे माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांनी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर गंभीर यांच्याकडून उत्तरदायित्वाची मागणी केली.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना श्रीकांत म्हणाले, “गंभीर यांना आता जबाबदार धरलं पाहिजे. टीम मॅनेजमेंटनेही आपल्या निर्णयांचा हिशेब द्यायलाच हवा.”
श्रीकांत यांनी २०२७ च्या विश्वचषकाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संघात सातत्याने होणाऱ्या बदलांवरही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “झिम्बाब्वे, श्रीलंका किंवा वेस्ट इंडिजला हरवल्यावर भारत पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचं म्हणणं योग्य नाही. भारताचं खरं मोजमाप बलाढ्य संघांविरुद्धच्या कामगिरीवरच व्हायला हवं.”
त्यांनी आगामी विश्वचषकापूर्वी फारच कमी एकदिवसीय सामने शिल्लक असल्याचे सांगत सतत प्रयोग करण्याच्या धोरणावर टीका केली. “आता ऑस्ट्रेलिया मालिका, आयपीएल आणि त्यानंतर थेट विश्वचषक आहे. अशा वेळी सतत संघात बदल करणं ही योग्य तयारी नाही,” असे ते म्हणाले.
केएल राहुलवर अन्याय
लॉर्ड्सवरील सामन्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना केएल राहुलला सहाव्या क्रमांकावर पाठवण्याच्या निर्णयावर श्रीकांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“केएल राहुलसारख्या फलंदाजाला सहाव्या क्रमांकावर पाठवणं म्हणजे त्याच्यावर अन्याय आहे. त्याने भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीला साथ देण्यासाठी राहुललाच वर पाठवायला हवं होतं,” असे श्रीकांत म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “राहुलला फलंदाजीला पाठवण्यात आलं तेव्हा सामना जवळपास हातातून निसटला होता. अक्षर पटेलसोबत प्रति षटक १५ धावांची गरज असताना तो एकट्याने सामना कसा जिंकणार?”
श्रीकांत यांनी संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी यांच्या कारकिर्दीबाबतही प्रश्न उपस्थित करत, आता केएल राहुललाही चुकीच्या निर्णयांचा फटका बसत असल्याचा आरोप केला.
