झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयात वेगवान गोलंदाज मयंक यादव याने ४ षटकांत अवघ्या १८ धावांत २ बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली. या शानदार कामगिरीबद्दल त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
दीर्घ दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या मयंकने सामन्यानंतर आपल्या संघर्षमय प्रवासाबद्दल मन मोकळे केले. तो म्हणाला, “दोन वर्षांचा काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. मी फक्त २२-२३ वर्षांचा होतो, पण एवढ्या कमी वयात खूप काही सहन करावं लागलं. मात्र देशासाठी खेळण्याची प्रेरणा कायम होती. त्यामुळेच पुनरागमन करून पूर्वीसारखीच कामगिरी करण्याचा निर्धार केला.”
इतर वेगवान गोलंदाजांशी असलेल्या समन्वयाबद्दल बोलताना मयंक म्हणाला, “आम्ही वेगाबद्दल फार चर्चा करत नाही, पण आमच्यातील बॉन्डिंग खूप चांगली आहे. मी पहिलं षटक टाकल्यानंतर प्रिन्स यादव आणि अशोक शर्मासोबत खेळपट्टीची मदत, योग्य लांबी आणि फलंदाजांवर अधिक दबाव कसा आणता येईल याबाबत चर्चा केली.”
या सामन्यात मयंकने ब्रायन बेनेटला शून्यावर आणि डायोन मायर्सला ६ धावांवर बाद केले. त्याला दुसऱ्या टोकावरून प्रिन्स यादव (२/२९) आणि अशोक शर्मा यांचीही चांगली साथ लाभली. भारताने झिम्बाब्वेचे १२५ धावांवर आव्हान रोखत १३.२ षटकांतच लक्ष्य गाठून मालिकेची विजयी सुरुवात केली.
