भारतीय संघाला टी-२० विश्वचषक २०२४ नंतर २०२६ मध्येही विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या भावना व्यक्त करताना हा क्षण आयुष्यातील सर्वात खास असल्याचे सांगितले. कठीण आव्हानांना सामोरे जाणे नेहमीच आवडते, म्हणूनच आपण क्रिकेट निवडल्याचेही त्याने सांगितले.
बीसीसीआय टीव्हीवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बुमराह म्हणाला,
“मी कधीही मागे लपून राहणारा नाही. मला नेहमी मैदानाच्या मध्यभागी राहायला आवडते. मला नेहमी कठीण काम करायचे होते आणि म्हणूनच मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. जेव्हा मी काहीतरी वेगळे करून दाखवतो, तेव्हा मला खूप आनंद होतो. यापेक्षा मोठा आनंद दुसरा असू शकत नाही.”
बुमराहने आपल्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितले की त्याने क्रिकेटची सुरुवात अहमदाबादमध्ये केली आणि गुजरातसाठी खेळताना हळूहळू प्रगती करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.
तो म्हणाला,
“मी अहमदाबादमध्येच क्रिकेट सुरू केले आणि इथूनच पुढे आलो. आज इथेच विश्वचषक खेळतोय आणि ‘मॅन ऑफ द मॅच’ होतोय, हे माझ्यासाठी खूप खास आहे. मागच्या वेळी आम्ही थोडे मागे पडलो होतो, पण यावेळी आम्ही पुढे गेलो.”
बुमराहने या विजयाच्या वेळी कुटुंबाची उपस्थितीही विशेष असल्याचे सांगितले.
“माझा मुलगा इथे होता, तो मागच्या वेळीही होता. यावेळी माझी आईही आली होती, त्यामुळे हा क्षण आणखी खास झाला. सलग दोन विश्वचषक जिंकणे हे याआधी कधीच घडले नव्हते. देव खूप दयाळू आहे आणि मी त्याबद्दल खूप आभारी आहे,” असे तो म्हणाला.
दरम्यान, ८ मार्च रोजी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषक २०२६ जिंकला. यासह भारताने सलग दुसरा आणि एकूण तिसरा टी-२० विश्वचषक जिंकत नवा इतिहास रचला. तसेच आपल्या घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत पहिलाच संघ ठरला.
सेमीफायनलमध्ये प्रभावी गोलंदाजी केल्यानंतर बुमराहने अंतिम सामन्यातही शानदार कामगिरी करत ४ षटकांत केवळ १५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. या दमदार प्रदर्शनासाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
