मोठ्या गर्जना, पण शेवटी माघार! पाकिस्तानची पुन्हा फजिती

मोठ्या गर्जना, पण शेवटी माघार! पाकिस्तानची पुन्हा फजिती

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताविरुद्ध १५ फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) घेतलेला बहिष्काराचा निर्णय आता मागे घेतला जाऊ शकतो, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सामना होण्याची शक्यता तब्बल ९९ टक्के आहे.

यापूर्वी पाकिस्तान सरकारच्या सल्ल्यानुसार पीसीबीने बांगलादेश क्रिकेटला पाठिंबा दर्शवत भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय जाहीर केला होता. १५ फेब्रुवारीला कोलंबो येथे होणारा हा सामना त्यांनी बहिष्कृत करण्याचे संकेत दिले होते. मात्र बदलत्या घडामोडींमध्ये आता या निर्णयावर पुनर्विचार सुरू असल्याचे समोर येत आहे.

भारत-पाकिस्तान सामना अंतिम करण्यासाठी सध्या शेवटच्या टप्प्यातील बैठक सुरू आहे. पीसीबीच्या सूत्रांनी आयएएनएसला सांगितले की, चर्चेला सकारात्मक दिशा मिळत असून सामना नियोजित वेळापत्रकानुसारच होण्याची दाट शक्यता आहे.

पाकिस्तानच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) कडक भूमिका घेतली होती. निवडक सहभाग हा जागतिक स्पर्धेच्या तत्त्वांशी विसंगत असल्याचे स्पष्ट करत आयसीसीने पीसीबीला परस्पर सहमतीने तोडगा काढण्याचे आवाहन केले होते.

आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले होते, “आम्ही पीसीबीकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा करत आहोत. मात्र निवडक सहभागाची भूमिका जागतिक स्पर्धेच्या मूलभूत तत्त्वांशी जुळत नाही. स्पर्धेतील सर्व संघांनी नियोजित वेळापत्रकानुसार समान अटींवर सामने खेळणे अपेक्षित असते.”

तसेच, “या निर्णयाचा पाकिस्तानमधील क्रिकेटवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. जागतिक क्रिकेट परिसंस्थेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्याचा पाकिस्तान स्वतः सदस्य आणि लाभार्थी आहे,” असेही आयसीसीने नमूद केले.

टी-२० विश्वचषकात पाकिस्तान ‘ग्रुप ए’मध्ये भारत, नामिबिया, नेदरलँड्स आणि अमेरिका यांच्यासोबत आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे या स्पर्धेचे यजमान आहेत.

दरम्यान, क्रिकेटप्रेमींचे लक्ष आता १५ फेब्रुवारीकडे लागले असून भारत-पाकिस्तान सामना रंगणार की नाही, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे डोळे लागले आहेत.

Exit mobile version