टी-२० विजेतेपदाला १९८३, २०११च्या विश्वचषकाची सर नाही

संजय मांजरेकरांच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

टी-२० विजेतेपदाला १९८३, २०११च्या विश्वचषकाची सर नाही

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्या समालोचक म्हणून ओळखले जाणारे संजय मांजरेकर हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२६ जिंकल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली आहे.

मांजरेकर यांनी म्हटले आहे की भारताने जिंकलेले तीन टी-२० विश्वचषक (२००७, २०२४ आणि २०२६) हे एकदिवसीय क्रिकेटमधील दोन ऐतिहासिक विश्वचषकांइतके (१९८३ आणि २०११) महत्त्वाचे नाहीत.

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले,
“दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या विश्वचषकांकडे आपण योग्य दृष्टीकोनातून पाहायला हवे. भारताने जिंकलेले टी-२० विश्वचषक हे कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये मिळालेल्या ५० षटकांच्या विश्वचषक विजयाच्या तुलनेत आव्हान आणि प्रतिष्ठेच्या बाबतीत कुठेच ठरत नाहीत.”

टी-२० विश्वचषक २०२६ जिंकल्यानंतर लगेचच मांजरेकर यांचे हे विधान समोर आले आणि सोशल मीडियावर त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्या मतावर नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय संघाने १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या विश्वचषकासाठी भारताला तब्बल २८ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. अखेर २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेला पराभूत करत पुन्हा विश्वचषक जिंकला.

टी-२० विश्वचषकाबाबत बोलायचे झाल्यास, भारताने २००७ मध्ये धोनी यांच्या नेतृत्वाखाली पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर दुसऱ्या विजेतेपदासाठी तब्बल १७ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत २०२४ मध्ये दुसरा टी-२० विश्वचषक जिंकला.

यानंतर सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ८ मार्च रोजी अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत टी-२० विश्वचषक २०२६ जिंकला. यासह भारत सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा आणि एकूण तीन टी-२० विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ ठरला. तसेच आपल्या घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकण्याचा मानही टीम इंडियाने मिळवला

Exit mobile version