फटक्यांतून बोलतोय एक नवा कोहली

फटक्यांतून बोलतोय एक नवा कोहली

आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, त्याच्या फलंदाजीच्या तंत्रात लक्षणीय बदल झाल्याचे मत माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांनी व्यक्त केले आहे.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या उद्घाटन सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर कोहलीने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १८ चेंडूत २८ धावांची खेळी केली. त्याच्या या आक्रमक शैलीमागील तांत्रिक बदलांविषयी अश्विन यांनी ‘चॅम्पियन्स वाली कमेंट्री’मध्ये सविस्तर भाष्य केले.

अश्विन म्हणाले की, २०२४ पर्यंत कोहली टेस्ट क्रिकेट खेळत असल्याने त्याची फलंदाजी अधिक संयमित आणि नियंत्रित होती. “त्या काळात त्याचे डोके आणि पायांची हालचाल स्थिर होती. मात्र २०२६ मध्ये तो टेस्ट क्रिकेट खेळत नसल्याने त्याच्या बॅटिंगमध्ये बदल दिसतो. बॅट सुरुवातीला खाली ठेवून नंतर वर नेण्याच्या हालचालीतून तो अधिक ऊर्जा निर्माण करतो. त्यामुळे आता त्याला हातांवर पूर्वीसारखे नियंत्रण ठेवण्याची गरज उरलेली नाही,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, माजी अष्टपैलू इरफान पठाण यांनीही कोहलीच्या बदललेल्या बॅकलिफ्टमुळे त्याच्या खेळात अधिक वेग आणि ताकद आल्याचे नमूद केले. “या तंत्रामुळे त्याला अधिक मोमेंटम मिळत असून स्ट्राइक रेट वाढण्यास मदत झाली आहे,” असे पठाण म्हणाले.

याच सामन्यापूर्वी एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे यांच्या नावाने एका स्टँडचे नामकरण करण्यात आले. याबद्दल आनंद व्यक्त करत कुंबळे म्हणाले, “माझ्या नावाने स्टेडियममध्ये कायमस्वरूपी एंड असणे हा माझ्यासाठी अत्यंत खास क्षण आहे.”

कोहलीच्या फलंदाजीतील या बदलांमुळे आयपीएल २०२६ मध्ये त्याचा खेळ अधिक आक्रमक आणि प्रभावी झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Exit mobile version