भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये शानदार कामगिरी करत मोठा उलटफेर केला आहे. भारतीय जोडीने जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकावरील चीनच्या जी यिफान आणि झांग शुक्सियन यांचा पराभव करत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयासह त्रिसा-गायत्री यांनी भारताचे पदक निश्चित केले आहे.
भारतीय जोडीने पहिला गेम गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत सामना १६-२१, २१-१५, २१-१३ असा जिंकला. या कामगिरीसह त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिला दुहेरीचे पदक जिंकणाऱ्या भारताच्या केवळ दुसऱ्या जोडी ठरल्या आहेत. यापूर्वी २०११ मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी कांस्यपदक जिंकले होते.
पहिल्या गेममध्ये चीनचा दबदबा
सामन्याची सुरुवात भारतीय जोडीसाठी फारशी चांगली झाली नाही. जी यिफान आणि झांग शुक्सियन यांनी सुरुवातीला ६-२ अशी आघाडी घेतली आणि पहिल्या गेममध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले. त्रिसा आणि गायत्री यांनी आक्रमक खेळ करत अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दमदार स्मॅश आणि नेटवरील खेळामुळे त्यांनी स्कोअर ८-९ असा जवळ आणला.
मात्र, चिनी जोडीने पुन्हा नियंत्रण मिळवत मध्यंतराला ११-८ अशी आघाडी घेतली. अखेर त्यांनी पहिला गेम २१-१६ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीचा पलटवार
दुसऱ्या गेममध्ये त्रिसा-गायत्री यांनी प्रतिस्पर्ध्यांना सहज वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही. लांब रॅलीमध्ये त्यांनी चिनी जोडीला कडवी झुंज दिली. बचावात संयम दाखवत भारतीय जोडीने मध्यंतराला ११-१० अशी आघाडी घेतली.
यानंतर त्रिसा आणि गायत्री यांनी आक्रमक खेळ आणखी तीव्र केला. क्रॉस-कोर्ट फटक्यांमुळे चिनी जोडीला सतत कोर्टच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावावे लागले. भारतीय जोडीने १७-१४ अशी आघाडी घेत अखेर दुसरा गेम २१-१५ असा जिंकत सामना निर्णायक गेममध्ये नेला.
निर्णायक गेममध्ये सलग सात गुणांचा धडाका
निर्णायक गेममध्ये दोन्ही जोड्यांनी ४-४ अशी बरोबरी साधली. त्यानंतर त्रिसाच्या जोरदार स्मॅशने भारतीय जोडीला महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. त्रिसा-गायत्री यांनी सलग सात गुण मिळवत स्कोअर ९-४ असा केला.
त्रिसाच्या आक्रमक खेळापुढे चिनी जोडी अडचणीत आली. भारतीय जोडीने मध्यंतराला ११-५ अशी भक्कम आघाडी घेतली.
मध्यंतरानंतर चीनच्या जोडीने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, त्रिसा-गायत्री यांनी सलग तीन गुण मिळवत पुन्हा सामन्यावर नियंत्रण मिळवले. वाढत्या दबावामुळे चिनी खेळाडूंकडून चुका होऊ लागल्या.
१८-९ अशी आघाडी मिळवल्यानंतर भारतीय जोडीने विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. अखेर २१-१३ असा निर्णायक गेम जिंकत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
या ऐतिहासिक विजयासह भारताचे महिला दुहेरीतील बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील आणखी एक पदक निश्चित झाले आहे. त्रिसा-गायत्री आता अंतिम फेरीत प्रवेश करून पदकाचा रंग बदलण्याच्या निर्धाराने कोर्टवर उतरतील.
