इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर किंग कोहली

इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर किंग कोहली

विराट कोहली फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाच ‘किंग’ नाही, तर जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग आयपीएलमध्येही त्याचा दबदबा कायम आहे. प्रत्येक हंगामात नवे विक्रम करणारा कोहली आयपीएल २०२६ मध्ये आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे.

विराट कोहलीने जर आगामी हंगामात आणखी ३३९ धावा केल्या, तर त्याच्या नावावर एकूण ९,००० धावा पूर्ण होतील. आयपीएल इतिहासात हा टप्पा गाठणारा तो पहिलाच फलंदाज ठरेल.

गेल्या तीन हंगामांतील कोहलीची कामगिरी पाहिली तर हा विक्रम दूर नाही.
२०२३ मध्ये त्याने ६३९ धावा (सरासरी ५३.२५),
२०२४ मध्ये ७४१ धावा (सरासरी ६१.७५),
तर २०२५ मध्ये ६५७ धावा (सरासरी ५४.७५) केल्या आहेत.

विशेष म्हणजे, २०२५ मधील त्याच्या दमदार प्रदर्शनामुळे RCB ला विजेतेपद मिळवण्यात मोठी मदत झाली.

२००८ पासून आरसीबीकडून खेळणाऱ्या कोहलीने आतापर्यंत २६७ सामन्यांत ८,६६१ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३९.५५ आणि स्ट्राइक रेट १३२.८६ आहे. त्याच्या नावावर ८ शतके आणि ६३ अर्धशतके आहेत. आयपीएलमध्ये ८,००० धावा पूर्ण करणारा तो एकमेव फलंदाज असून, सर्वाधिक शतकांचाही विक्रम त्याच्याच नावावर आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहितने २७२ सामन्यांत ७,०४६ धावा केल्या असून, त्याच्या नावावर २ शतके आणि ४७ अर्धशतके आहेत. तर इंग्लंडचा जोस बटलर ७ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर असून, या हंगामात त्याच्याकडे कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी असेल.

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने, या फॉरमॅटमध्ये त्याला पाहण्याचे एकमेव व्यासपीठ म्हणजे आयपीएल आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आयपीएल २०२६ चा पहिला सामना २८ मार्च रोजी आरसीबी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा रंगणार आहे.

Exit mobile version