सरकार उलथवण्याचा दम देणाऱ्यांना अखेर उत्तर…

सरकार उलथवण्याचा दम देणाऱ्यांना अखेर उत्तर... | Dinesh Kanji | Amit Shah | J.P Nadda |

संसदेत अलिकडे गदारोळाशिवाय कामकाज चालतच नाही. मोदी सरकारचे नेते बेरके आहेत. या गोंधळातही अनेकदा गेम करून जातात. काय झाले आहे, हे विरोधकांच्या लक्षात येण्याआधी सरकारला जे काही करायचे ते आहे, ते फत्ते झालेले असते. अशाच गोंधळात राज्यसभेतील सभागृह नेते, केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी ‘विद्यार्थी नेते असले म्हणून काय, कायदा हातात घ्याल, तर अटक होणारच’ असे ठणकावून सांगितले. हे प्रकरण जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाशी संबंधित नव्हते. तरीही नड्डा जे काही म्हणाले त्याचा अर्थ समजदारांना व्यवस्थित समजला. सरकार झुकलेले, वाकलेले नाही, सरकारचा कणा ताठ आहे, हे नड्डा यांनी दाखवून दिले आहे. ज्यांना फक्त घी दिसले होते, त्यांना नड्डांनी बडगाही दाखवलाय. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सरकार झुकले असा ज्यांचा गैरसमज झालेला आहे, अशा सगळ्यांच्या कानावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते जे.पी.नड्डा यांची डरकाळी गेली असणार. राज्यसभेत डाव्यांसह काँग्रेसच्या अरेरावीला चेपताना नड्डा जे काही म्हणाले, त्यात कोणताही आडपडदा नव्हता. सरकारची अत्यंत सुस्पष्ट आणि रोखठोक भूमिका होती. सरकार जे काही करेल ते कायद्याच्या चौकटीत. कारवाई करताना अजिबात कचरणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेत सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू होती. याच दरम्यान विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा आचरटपणा सुरू असल्यामुळे राज्यसभेतील या घडामोडीकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. कोकरोच मंडळींनी या भूमिकेची दखल घ्यायला हरकरत नाही.

Exit mobile version