पंजाब पोलिसांनी पाकिस्तानलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करत ५८५ ठिकाणी एकूण २,२९१ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. याला राज्याची “दुसरी सुरक्षा रेषा” म्हणून विकसित करण्यात येत असून संवेदनशील गावे आणि महत्त्वाच्या मार्गांवर काटेकोर नजर ठेवली जात आहे. हा उपक्रम “गँगस्टरन ते वार” मोहिमेअंतर्गत राबवण्यात येत असून सीमापार कार्यरत असलेल्या संघटित गुन्हेगारी जाळ्यांची पुरवठा साखळी खंडित करणे हा त्यामागील उद्देश आहे.
सीमा सुरक्षा दल (BSF) जिथे आंतरराष्ट्रीय सीमेची देखरेख करत आहे, तिथे पंजाब पोलिस राज्याच्या आत कोणतीही तस्करी पुढे जाऊ नये याची खात्री करत आहेत. सीमेवरून काही अवैध माल आत आला तरी तो राज्यात पुढे जाऊ नये, यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे.
पोलिसांनी माहिती दिली की सीमेलगतच्या जिल्ह्यांतील ४१ पोलिस ठाण्यांना या सीसीटीव्ही नेटवर्कशी जोडण्यात आले आहे, ज्यामुळे निरीक्षण आणि त्वरित कारवाईची क्षमता अधिक बळकट झाली आहे. राज्यातील तपास नाके (चेकपोस्ट) अधिक प्रभावी आणि अनपेक्षित बनवण्यात आले आहेत. वाहन तपासणी आता केवळ औपचारिक न राहता गुप्त माहितीच्या आधारे लक्ष्यित पद्धतीने केली जात आहे. सीमेलगतच्या भागात ड्रोनद्वारे शस्त्रे आणि अमली पदार्थ टाकण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अँटी-ड्रोन देखरेखही वाढवण्यात आली आहे.
अमृतसर ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक सुहैल कासिम मीर यांनी सांगितले की “दुसरी सुरक्षा रेषा” ही गुन्हेगारी साखळी प्रभावीपणे तोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सीमेवर काहीही घुसखोरी झाली तरी पोलिस त्यांच्या कार्यक्षेत्रात ती त्वरित रोखू शकतात. त्यांनी पुढे सांगितले की गावस्तरावरील सुरक्षा समित्या आणि स्थानिक नेटवर्कलाही या सुरक्षा व्यवस्थेशी जोडण्यात आले आहे, जेणेकरून कोणतीही संशयास्पद हालचाल त्वरित लक्षात येईल.
हे ही वाचा:
विधानपरिषदेसाठी मविआकडून अंबादास दानवे; काँग्रेसची भूमिका काय?
पश्चिम बंगालच्या फाल्टामध्ये इव्हीएममधील भाजपच्या बटणावर लावली टेप
जपानमध्ये प्रदर्शित होणार ‘धुरंधर’
पश्चिम बंगालच्या फाल्टा येथील संयुक्त ब्लॉक विकास अधिकाऱ्याची बदली
पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की “दुसरी सुरक्षा रेषा” मजबूत करणे ही राज्याच्या अँटी-गँगस्टर धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. सीमापार पुरवठ्यापासून अंतिम वितरणापर्यंत संपूर्ण गुन्हेगारी नेटवर्क मोडून काढणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यांनी स्पष्ट केले की तस्करी किंवा गुन्हेगारी प्रयत्न आढळताच ते प्रारंभीच थांबवून निष्क्रिय केले जातील.
