गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा व्यापक नियोजन केले आहे. गणेशोत्सव आणि गौरी-गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणासाठी ५,२२० अतिरिक्त विशेष बस फेऱ्या चालविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यातील विविध भागांतून या विशेष बस सोडण्यात येणार असून, त्यासाठी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जात आहे.
एसटी प्रशासनाच्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महानगर प्रदेशातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असणार आहे. ही अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नियमित बससेवेवर ताण येऊ नये, यासाठी विशेष बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
यंदा समूह आरक्षणालाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. विविध मंडळे, कुटुंबे, तसेच चाकरमान्यांच्या गटांनी मोठ्या प्रमाणात विशेष बस आरक्षित केल्या आहेत. काही मार्गांवरील बसचे आरक्षण जवळपास पूर्ण झाले असून, उर्वरित प्रवाशांनी वेळेत आरक्षण करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावरील बहुतांश काम पूर्ण झाल्याने कोकणातील प्रवासाचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानेही बसचे वेळापत्रक आणि फेऱ्यांचे नियोजन अधिक प्रभावीपणे केले आहे. गरजेनुसार राज्यातील विविध आगारांतून आणखी बस उपलब्ध करून देण्याची तयारीही महामंडळाने ठेवली आहे.
प्रवाशांना एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर, मोबाईल अॅपद्वारे, अधिकृत आरक्षण केंद्रांमधून तसेच आगारांमध्ये जाऊन आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. प्रवाशांची मागणी वाढल्यास आणखी विशेष बस सोडण्याचाही विचार करण्यात येणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
‘धुरंधर’ ठरला नेटफ्लिक्सवर २०२६ मधील नंबर वन चित्रपट
सौदी अरेबिया-पाकिस्तान-तुर्कीची नवी संरक्षण आघाडी ‘इस्लामिक नाटो’?
भारतीय हवाई दलाला मिळाल्या पहिल्या महिला ‘टॉप गन’
कॅलिफोर्नियात ट्रेकिंगला गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला
दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतून लाखो चाकरमानी आपल्या मूळ गावी परततात. रेल्वे आणि खासगी वाहनांबरोबरच एसटीला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याने यंदाही प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी महामंडळाने विशेष बससेवेचे नियोजन केले आहे.
