७ मराठा लाईट इन्फंट्रीचा शौर्य, स्मृतींचा मेळावा आज सोलापूरमध्ये

शौर्य, त्याग आणि ६३ वर्षांचा देदिप्यमान इतिहास

७ मराठा लाईट इन्फंट्रीचा शौर्य, स्मृतींचा मेळावा आज सोलापूरमध्ये

“भारता आम्ही तुलाच देव मानतो, हाच महाराष्ट्र धर्म आम्ही एक जाणतो…” या ओळी केवळ शब्द नाहीत, तर ७ मराठा लाइट इन्फंट्रीच्या प्रत्येक जवानाच्या श्वासातील मंत्र आहे. १ जानेवारी २०२६ रोजी, या महान बटालियनने आपल्या गौरवशाली अस्तित्वाची ६३ वर्षे पूर्ण केली आहेत. हा इतिहास केवळ तारखांचा नाही, तर मातृभूमीच्या रक्षणासाठी सांडलेल्या रक्ताचा, दिलेल्या बलिदानाचा आणि शत्रूला पाणी पाजणाऱ्या असीम धैर्याचा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज की जय!” हा केवळ एक रणघोष नाही, तर अंगात रक्ताचे पाणी करून शत्रूवर तुटून पडण्याची प्रेरणा देणारा एक मंत्र आहे. ‘कर्तव्य, मान, साहस’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून आणि ‘मर्द आम्ही मराठे खडे’ या स्फूर्तीगीताचा हुंकार मनात ठेवून ७ मराठा लाईट इन्फंट्रीने भारतीय भूमीच्या रक्षणासाठी आपले रक्त सांडले आहे.

४ जानेवारी २०२६ रोजी, सोलापूरच्या ऐतिहासिक भूमीवर ही बटालियन आपला ६३ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. हा केवळ एक कार्यक्रम नसून, मराठा वीरांच्या असीम त्यागाचा आणि पराक्रमाचा गौरव सोहळा आहे.

रणभूमी गाजवणारे शूर सुपुत्र

१ जानेवारी १९६३ रोजी बेळगावच्या पवित्र भूमीत या बटालियनची स्थापना झाली. तेव्हापासून आजवर भारतीय सैन्याच्या इतिहासात ७ मराठाने आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. भारतीय सैन्याने आजवर लढलेल्या सर्व युद्धांच्या इतिहासात या बटालियनच्या शौर्याची गाथा सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली आहे. १९६५ च्या युद्धात बटालियनने उत्कृष्ट कामगिरी बजावली.

१९७१ चे रणसंग्राम: पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात या बटालियनने शत्रूच्या छातीत धडकी भरवली. ‘अमरखरा’ असो वा ‘पचगढ’, शत्रूचा अभेद्य गड मोडीत काढत या वीरांनी विजयश्री खेचून आणली.

कांटानगर ब्रिजचा थरार: शत्रूच्या तोफा धडाडत होत्या, गोळ्यांचा पाऊस पडत होता, पण या मराठा वीरांनी मरणाची भीती न बाळगता दिवसाढवळ्या धाडसी हल्ला चढवला आणि विजय मिळवला.

हे ही वाचा:

उपराष्ट्रपतींनी श्रीशक्ती अम्मांच्या सेवाभावी कार्याचे केले कौतुक

विवान कारूळकरच्या ‘सनातनी तत्त्व’ला भरघोस प्रतिसाद

कॅल्शियमने भरलेले तीळ हाडांसाठी वरदान

व्हेनेझुएलाचा भारतासोबतचा व्यापार खूपच कमी

नागालँडच्या घनदाट जंगलांपासून ते जम्मू-काश्मीरच्या उणे तापमानातील तंगधार, पूंछ, चोरबत ला आणि उरी यांसारख्या दुर्गम शिखरांपर्यंत… जिथे जिथे देश संकटात होता, तिथे तिथे ‘७ मराठा’चा जवान ढाण्या वाघासारखा उभा राहिला.

रक्ताने लिहिलेला सन्मान

या बटालियनने केवळ युद्धे जिंकली नाहीत, तर देशाचा सर्वोच्च सन्मानही मिळवला. त्यांच्या शौर्याची साक्ष त्यांची पदके देतात:
मानाचे पुरस्कार: २ कीर्ती चक्र, २ शौर्य चक्र आणि १६ सेना पदके या बटालियनच्या शौर्याची ग्वाही देतात.

सन्मान आणि गौरव

• २७ नोव्हेंबर १९९८: ‘जीओसी-इन-सी (GOC-in-C) नॉर्दर्न कमांड युनिट अप्रीसिएशन’ने सन्मानित.
• १५ जानेवारी १९९९: नियंत्रण रेषेवरील (LoC) आणि दहशतवादविरोधी मोहिमांमधील आदर्श कामगिरीबद्दल मानाच्या **’थलसेनाध्यक्ष (COAS) युनिट सायटेशन’**ने गौरवण्यात आले.
• १५ जानेवारी २०१०: उरी सेक्टरमधील लाछीपुरा येथे ७९ माउंटेन ब्रिगेडसोबत कार्यरत असताना, पुन्हा एकदा ‘जीओसी-इन-सी नॉर्दर्न कमांड युनिट अप्रीसिएशन’ बहाल करण्यात आले.
• बटालियनला युनायटेड नेशन्सच्या पीस कीपिंग मिशन करता निवडण्यात आले.

६३ वर्षांचा अभेद्य वारसा

आज १ जानेवारी २०२६ रोजी आपल्या स्थापनेचा ६३ वा वाढदिवस साजरा करताना, ही बटालियन केवळ एक लष्करी तुकडी उरलेली नाही, तर ती एक ‘परंपरा’ बनली आहे.
“रक्त शिंपुनी पवित्र ठेवितो धरा…” हे ब्रीद सार्थ ठरवणाऱ्या, वीर मातांच्या कुशीतून जन्मलेल्या आणि सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांसारखी छाती असणाऱ्या सर्व जवान आणि अधिकाऱ्यांना मानाचा मुजरा!

कार्यक्रमाची रूपरेषा: एक भावनात्मक प्रवास
हुतात्म्यांना वंदन: सोहळ्याची सुरुवात सकाळी १० वाजता. ज्या वीर पुत्रांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जाईल.

शौर्याचे दर्शन: त्यानंतर जवानांच्या साहसी खेळांचे प्रदर्शन होईल, जे पाहून उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहतील. मराठा रेजिमेंटच्या पराक्रमाचे वीरश्रीयुक्त पोवाडे जेव्हा गायले जातील, तेव्हा पुन्हा एकदा इतिहासातील मर्दानी शौर्याचा अनुभव येईल.

सैनिक संमेलन: या विशेष प्रसंगी बटालियनचे माजी कमांडिंग ऑफिसर्स आणि सुभेदार मेजर आपल्या अनुभवांतून जवानांना मार्गदर्शन करतील. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीर माता, वीर पत्नी आणि शूर सैनिकांचा सन्मान.

एकता आणि आठवणी: कार्यक्रमाचा कळस म्हणजे सर्वांनी एकत्रितपणे गायलेले ‘मराठा स्फूर्ती गीत’. त्यानंतर, देशभरातून आलेले ७०० हून अधिक माजी सैनिक आणि अधिकारी एकमेकांना भेटतील, जुन्या आठवणींना उजाळा देतील आणि स्नेहभोजनाने या अविस्मरणीय दिवसाची सांगता होईल.
“रक्तात ज्यांच्या मर्दानगी, मनी शिवरायांचे नाव… अशा ७ मराठा वीरांचा, सोलापूरला रंगणार ठाव!”

हा सोहळा म्हणजे केवळ माजी सैनिकांचे एकत्र येणे नसून, एका मोठ्या कुटुंबाची पुनर्भेट आहे. ज्यांनी खांद्याला खांदा लावून सीमेवर शत्रूचा सामना केला, ते आज पुन्हा एकदा आपल्या ‘रेजिमेंटल’ कुटुंबासोबत हा आनंदाचा क्षण साजरा करतील. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुभेदार मेजर बाळू पवार साहेब आणि सोलापूर जिल्ह्यातील इतर वीर जवान आहेत

Exit mobile version