“काँग्रेस म्हणजे भारताच्या विकासाला विरोध करणाऱ्या शक्तींच्या हातातील बाहुली”

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर प्रहार

“काँग्रेस म्हणजे भारताच्या विकासाला विरोध करणाऱ्या शक्तींच्या हातातील बाहुली”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील सिलचर येथे निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना पुन्हा एकदा कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला. शनिवार, १४ मार्च रोजी आपल्या भाषणात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, मध्य पूर्वेतील युद्धादरम्यान सरकार आपल्या नागरिकांवर संघर्षाचा परिणाम कमी करण्यासाठी काम करत असताना, कॉंग्रेस भारतीयांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. काँग्रेस ही भारताच्या विकासाला विरोध करणाऱ्या शक्तींच्या हातातील बाहुली बनली आहे, असा सणसणीत आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

नरेंद्र मोदी म्हणाले की, “आपल्या देशातील नागरिकांना शक्य तितक्या कमी अडचणींना तोंड द्यावे यासाठी आमचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. देशाच्या नागरिकांवर युद्धाचा होणारा परिणाम कमीत कमी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या महत्त्वाच्या टप्प्यावर, काँग्रेस पक्ष जबाबदार राजकीय घटकाची भूमिका पार पाडेल अशी अपेक्षा होती. तथापि, राष्ट्रीय हिताच्या बाबतीत या महत्त्वाच्या कामात काँग्रेस पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे,” असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला. पुढे ते म्हणाले की, देश अडचणीत सापडावा, यासाठी काँग्रेस देशात दहशत निर्माण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, जेणेकरून नंतर ते मोदींवर शिवीगाळ करू शकतील.

“जगभरातील ज्या शक्ती भारताच्या जलद विकासाला पचवू शकत नाहीत, त्यांच्या हातातील कठपुतळी कॉंग्रेस बनत चालली आहे,” अशी कठोर शब्दांत नरेंद्र मोदींनी टीका केली. तसेच पंतप्रधानांनी काँग्रेसच्या निवडणुकांमधील अपयशाबद्दल भाष्य करताना म्हटले की, एकामागून एक राज्यात काँग्रेसचा निवडणुकीत पराभव झाला आहे आणि लवकरच ते पराभवाचे शतक पूर्ण करणार आहे. “तुम्ही आसाममधून काँग्रेसला हाकलून लावले आहे. आज देशातील प्रत्येक राज्य काँग्रेसला धडा शिकवत आहे. काँग्रेस एकामागून एक निवडणुका हरत आहे. नजीकच्या भविष्यात काँग्रेस पराभवाच्या शतकापर्यंत पोहोचणार आहे,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

हे ही वाचा:

देशभरात महामार्ग आणि पायाभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक

IRINS लावनच्या अनावश्यक क्रू मेंबर्सला भारताने पाठवले मायदेशी!

उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने डागले १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्र

१ एप्रिलपासून टोल प्रवास महागणार

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी सिलचरमध्ये २३,५५० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे अनावरण केले, ज्यामध्ये सिलचर आणि शिलॉंग दरम्यान २२,८६४ कोटी रुपयांचा १६६ किमी लांबीचा नियंत्रित एक्सप्रेसवे समाविष्ट आहे जो गुवाहाटी आणि सिलचर दरम्यानच्या प्रवास वेळेत लक्षणीय घट करेल, तसेच सिलचरमध्ये राष्ट्रीय महामार्ग-३०६ वर ५६५ कोटी रुपयांच्या एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि करीमगंज जिल्ह्यातील पाथरकांडी येथे १२२ कोटी रुपयांच्या कृषी महाविद्यालयाची पायाभरणी देखील समाविष्ट आहे.

Exit mobile version