मल्ल्या, नीरव मोदीसह इतरांचे लवकरच प्रत्यार्पण? ब्रिटिश पथकाची तिहार तुरुंगाला भेट!

शिष्टमंडळाने कैद्यांशी साधला संवाद

मल्ल्या, नीरव मोदीसह इतरांचे लवकरच प्रत्यार्पण? ब्रिटिश पथकाची तिहार तुरुंगाला भेट!

वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, आर्थिक आणि गुन्हेगारी आरोपांखाली भारताला हव्या असलेल्या फरार आरोपींच्या प्रत्यार्पणाला मंजुरी मिळावी, यासाठी ब्रिटनच्या न्यायालयांना पटवून देण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या (CPS) शिष्टमंडळाने अलीकडेच नवी दिल्लीतील तिहार तुरुंगाची पाहणी केली. या भेटीचा उद्देश भारतातील तुरुंगातील परिस्थिती आणि सुरक्षिततेची पातळी तपासणे असा होता, जेणेकरून ब्रिटनमधील न्यायालयांना हे समजावता येईल की, प्रत्यार्पण झाल्यानंतर आरोपींसोबत मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही. हा दौरा भारताच्या उच्च-प्रोफाईल फरार आरोपींच्या परताव्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांच्या मते, सीपीएस टीमने तिहारच्या उच्च-सुरक्षा वॉर्डला भेट दिली आणि कैद्यांशी संवाद साधला. भारतीय अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की भारतात परत आणलेल्या आंतरराष्ट्रीय फरार कैद्यांना सुरक्षित परिस्थितीत ठेवण्यात येईल आणि गरज पडल्यास, हाय-प्रोफाइल कैद्यांना सामावून घेण्यासाठी तुरुंगात एक विशेष “एनक्लेव्ह” बांधता येईल.

ब्रिटिश न्यायालयांनी भूतकाळात भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंत्या वारंवार नाकारल्या, यामागचं प्रमुख कारण म्हणजे भारतातील तुरुंगातील परिस्थितीबाबत व्यक्त केलेली चिंता. या पार्श्वभूमीवरच, ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या (CPS) शिष्टमंडळाने अलीकडेच तिहार तुरुंगाची पाहणी केली. या अडथळ्यांना तोंड देण्यासाठी, भारत सरकारने ब्रिटनला आश्वासन दिलं आहे की, आरोपींवर कोठडीत असताना कोणतीही बेकायदेशीर किंवा अमानवी चौकशी केली जाणार नाही आणि त्यांचे मानवी हक्क पूर्णपणे जपले जातील.
परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, विविध देशांमध्ये भारताच्या १७८ प्रत्यार्पण विनंत्या प्रलंबित आहेत, त्यापैकी सुमारे २० एकट्या ब्रिटनमध्ये आहेत. यापैकी अनेक प्रकरणे आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित आहेत, ज्यामध्ये बँका आणि वित्तीय संस्थांशी फसवणूक केल्याचे आरोप आहेत.
सर्वात हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये फरार मद्यसम्राट विजय मल्ल्या , ज्यावर ९,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त बँक कर्ज बुडवल्याचा आरोप आहे आणि १३,८०० कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याचा समावेश आहे. दरम्यान, जुलै महिन्यात, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, फरार आरोपींना लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार ब्रिटिश अधिकाऱ्यांसमवेत सातत्याने प्रयत्नशील आहे.
Exit mobile version