स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्या बद्दल सात्यकी सावरकर वि. राहुल गांधी प्रकरण न्यायालयात चालू आहे. विशेष एमपीएमएलए न्यायालयाने यापूर्वी राहुल गांधी यांना कोर्टात सदर फौजदारी केसच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने राहुल गांधींच्या वकिलांनी केलेल्या अर्जा नुसार उपस्थित न राहण्याची सूट दिली होती. परंतु सात्यकी सावरकरांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी ७ नोव्हेंबरला, राहुल गांधी यांच्या कडून सदर गैरहजेरी बाबत मिळालेल्या परवानगीचा दुरुपयोग केला जात असून न्यायालयाने घातलेल्या अटी शर्थीचे पालन योग्य प्रकारे पालन होत नसल्यामुळे राहुल गांधी यांना अनुपस्थित राहण्याची दिलेली सदर परवानगी रद्द करावी, असा अर्ज न्यायालयाकडे केला आहे.
गेल्या सुनावणीवेळी आरोपी राहुल गांधी यांच्या वकिलांनी राहुल गांधी यांच्या वतीने न्यायालयात एक पर्सिस PURSIS म्हणजे इन्फॉर्मेशन फॉर रेकॉर्ड असा अर्ज दाखल केला होता. तो अचानक मागे घेत सदर पर्सिस राहुल गांधी यांना मान्य नसून त्यांच्या संमतीविनाच त्यांच्या वकिलांनी दाखल केला होता, असे स्पष्ट झाले. यावरूनच सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. कारण अटीनुसार, राहुल गांधीनी नियमितपणे आपल्या वकिलाशी संपर्क ठेवून योग्य ते निर्देश व माहितीची देवघेव करणे बंधनकारक आहे. त्याचा भंग झाल्याचे दावा संग्राम कोल्हटकर यांनी अर्जाद्वारे केला आहे.
हे ही वाचा:
मोठा दहशतवादी कट उधळला; सात जणांच्या अटकेसह २,९०० किलो स्फोटके जप्त
राजस्थान, गुजरात आणि अरबी समुद्रात संयुक्त मोहीम
सदर अर्जास उत्तर देणे राहुल गांधी यांना बंधनकारक असताना सुद्धा, अनाकलनीय कारणामुळे सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी दिलेल्या अर्जांचा उद्देश व अर्थच कळत नाही, या विचित्र सबबीखाली राहुल गांधी यांचे वकील दर तारखेस पुढील तारीख मागून मूळ केस पुढे चालू देत नाहीत, असा आरोप एड. संग्राम पाटील यांनी केला आहे.
न्यायालयाने या प्रकरणातील दिरंगाई लक्षात घेऊन लगेचच १३ नोव्हेंबरची तारीख दिल्यामुळे राहुल गांधींना सात्यकी सावरकर यांच्या अर्जावर आपले म्हणणे मांडणे बंधनकारक झाले आहे. आता हा अर्ज मंजूर झाल्यास लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लवकरच कोर्टासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक होणार आहे.
