माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत दिले स्पष्टीकरण

न्यायालयीन निर्णयावर चर्चा होऊ शकते पण संशय व्यक्त करणे धोकादायक

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत दिले स्पष्टीकरण

गेली काही वर्षे माजी न्यायाधीश लोया यांच्या मृत्युबाबत वेगवेगळे आरोप केले गेले आहेत. त्यातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न होऊनही लोया यांचा मृत्यू हे भाजपाचे कारस्थान असल्याचा आरोप केला गेला त्यावर आता माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

२० सप्टेंबर (शनिवार) रोजी लल्लनटॉप ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “लोकांना एखाद्या निकालाशी असहमती दर्शवण्याचा अधिकार आहे. हेच तर लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. पण न्यायाधीशांच्या मनसुब्यांवर हल्ला करणे चुकीचे आहे. त्यांच्या मते, पुराव्यापासून चर्चा दूर जाऊन न्यायव्यवस्थेवरच हल्ले सुरू होणे हे केवळ अन्यायकारकच नाही तर धोकादायक आहे.

न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची घटना

चंद्रचूड यांनी २०१४ मधील घटनेची आठवण सांगितली. नोव्हेंबर २०१४ मध्ये न्यायमूर्ती लोया नागपूरला एका सहकारी न्यायाधीशाच्या लग्नाला गेले होते. ते तेव्हा रवी भवन या शासकीय विश्रामगृहात इतर न्यायाधीशांसोबत राहत होते. प्रश्न उपस्थित झाला की तीन न्यायाधीश एका खोलीत कसे राहिले?

यावर चंद्रचूड म्हणाले, “न्यायालयीन सुनावणीत आम्ही सांगितले होते की तुम्हाला न्यायपालिका, देश, समाज माहीत नाही. लग्नासारख्या प्रसंगी अनेक न्यायाधीश एकत्र राहतात, १०-१५ किंवा कधी २०-२५ जणसुद्धा. त्याच रात्री पहाटे ४ वाजता न्यायमूर्ती लोया यांनी दोन सहकाऱ्यांना जागवले आणि आपल्याला बरं वाटत नसल्याचे सांगितले. त्यांनी लगेच लोया यांना रिक्षाने रुग्णालयात नेले. का गाडीचा वापर केला नाही, हा प्रश्न उपस्थित झाला.

यावर चंद्रचूड म्हणाले, प्रत्येक न्यायाधीशाकडे स्वतःची गाडी किंवा ड्रायव्हर नसतो. मीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असताना माझा चालक माझ्याबरोबर राहत नव्हता. डॉक्टरांनी तपासल्यानंतर सांगितले की, हा हृदयविकाराचा झटका आहे, त्यामुळे कार्डियाक रुग्णालयात न्यावे लागेल. तिथे नेत असतानाच न्यायमूर्ती लोया यांचे निधन झाले.

उपचारांबाबतच्या शंका

प्रश्न असा होता की, त्यांना थेट कार्डियाक रुग्णालयात का नेले नाही? सुरुवातीला ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये का नेले? यावर चंद्रचूड म्हणाले, आपल्या घरीसुद्धा अचानक पालक आजारी पडले, तर आपण तत्काळ जे सुचते तेच करतो. त्या दोन न्यायाधीशांनीही तेच केले. आपण का गृहीत धरावे की त्यांनी जाणूनबुजून त्यांना मारायचा प्रयत्न केला? त्यांनी उदाहरण दिले की अलीकडेच एक न्यायाधीश प्रवासात हृदयविकाराने दगावले, तेव्हा त्वरित मदत मिळूनही मृत्यू टाळता आला नाही.

हे ही वाचा:

११ वर्षांपासून भारतात रहिवास करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘जीएसटी बचत उत्सवाची घोषणा’

नोएडा विमानतळावरून लवकरच कमर्शियल उड्डाणे

“राहुल गांधी पप्पू आहेत आणि पप्पूसारखेच बोलतात”

निकालावर टीका होऊ शकते, पण हेतूंवर नाही

चंद्रचूड यांनी स्पष्ट केले, निकालावर असहमती असू शकते, पण न्यायाधीशांच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आणि धोकादायक आहे. सुप्रीम कोर्टाने लोया प्रकरणातील सर्व मुद्द्यांची बारकाईने चौकशी करून निकाल दिला. लोक निकालाशी असहमत असू शकतात, पण न्यायाधीशांच्या वैयक्तिक प्रामाणिकतेवर हल्ला करण्याचा अधिकार त्यांना नाही.”

नव्या चौकशीबाबत इशारा

त्यांनी म्हटले की, जर नव्याने चौकशी आदेशित झाली, तरीही वाद संपणार नाही. चौकशीत काही सापडले नाही, तर त्याला काहीतरी दडवल्याचे म्हटले जाईल आणि काही सापडले तर “कटकारस्थान” असल्याचा आरोप होईल. अशा पद्धतीने सतत चौकश्या मागत राहणे ही राजकीय कथा जिवंत ठेवण्याची युक्ती आहे. यामुळे संस्थांवरील लोकांचा विश्वास कमी होतो,” ते म्हणाले.

न्यायपालिकेला राजकारणात ओढण्याचा धोका

चंद्रचूड यांनी सावधगिरीचा इशारा दिला की, न्यायिक निर्णयांवर टीका व चर्चा होणे सामान्य आहे. पण त्या चर्चेला व्यक्तिगत प्रामाणिकतेवर शंका घेणाऱ्या मोहिमेत रूपांतर करणे अमान्य आहे. यामुळे समाजाच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला धक्का बसतो.

Exit mobile version