राज्यपालांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा स्थापना दिन साजरा

राज्यपालांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा स्थापना दिन साजरा

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिवस मुंबई येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी तटरक्षक दलाच्या विस्तार योजनेचे कौतुक करताना १५१ हून अधिक जहाजे, ७८ विमान आणि ४६ प्रगत रडार स्थानकांसह, भारतीय तटरक्षक दल जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तटरक्षक दल झाले असल्याचे सांगितले.

राज्यपालांनी भारतीय तटरक्षक दलाचे देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (EEZ) विस्तीर्ण भागावर चोवीस तास निगराणी ठेवण्यासाठी कौतुक केले. गुजरात आणि केरळमधील विनाशकारी पुरस्थितीनंतर मदत व बचावकार्याच्या वेळी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल राज्यपालांनी तटरक्षक दलाचे अभिनंदन केले. राज्यपालांनी किनारपट्टी स्वच्छता मोहिमा आणि वृक्षारोपण यांसारख्या पर्यावरणीय उपक्रमांसाठी तटरक्षक दलाचे विशेष कौतुक केले.

हेही वाचा..

सीपीआय(एम)चे आमदार एम मुकेश यांच्याविरुद्ध बलात्कार प्रकरणात आरोपपत्र दाखल

महाकुंभ : अमृतस्नानासाठी तयार रहा, कोणतीही चूक होऊ देऊ नका !

अर्थसंकल्पाबद्दल राहुल गांधी यांना शून्य ज्ञान

वक्फ दुरुस्ती विधेयक संयुक्त समितीचा अहवाल सोमवारी सादर होणार

यावेळी नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंह, भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे महासंचालक ए. के. हरबोला, तटरक्षक दलाच्या पश्चिम तट विभागाचे कमांडर महानिरीक्षक भिषम शर्मा तसेच भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी आयोजित चहापानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना राज्यपालांनी तटरक्षक दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व तटरक्षक दलाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी पंडित राहुल शर्मा यांनी संतूरवादन सादर केले. पंडित आदित्य कल्याणपूर यांनी त्यांना तबला साथ दिली.

Exit mobile version