गांगुली म्हणतात, “कर्णधार म्हणून रोहितच बेस्ट!”

जूनमध्ये होणाऱ्या २०-२० विश्वचषकापर्यंत भारताने नेतृत्वबदल टाळावा

गांगुली म्हणतात, “कर्णधार म्हणून रोहितच बेस्ट!”

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने केवळ अंतिम सामना गमावला आणि चषक हातातून निसटला. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने सर्व सामने सहज जिंकले होते. कर्णधार म्हणून रोहित शर्माने संपूर्ण जगाला खूप प्रभावित केले. त्यामुळे पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या २० – २० विश्वचषकापर्यंत तरी भारताने नेतृत्वबदल टाळावा आणि रोहितलाच तिन्ही प्रारूपांत कर्णधारपदी कायम ठेवावे, असे मत माजी कर्णधार आणि ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केले.

आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सामन्यांसाठी संघ जाहीर झाले असून मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टी-२० संघाचे नेतृत्व सुर्यकुमार यादव करणार आहे तर, एकदिवसीय संघाचे नेतृत्व के एल राहुल करणार आहे. त्यामुळे रोहित आणि विराटच्या भूमिकेची चर्चा होती. आगामी वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताचे कर्णधारपद भूषवण्यासाठी रोहितच योग्य आणि सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत गांगुली यांनी व्यक्त केले आहे.

“क्रिकेटच्या तीनही प्रारूपांत रोहितच भारतीय संघाचा कर्णधार असला पाहिजे. त्याने नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात कर्णधार म्हणून अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे भारताला सध्या नेतृत्वबदलाची गरज आहे असे मला वाटत नाही. विश्वचषकात रोहित आणि विराट यांची कामगिरी आपण सर्वांनीच पाहिली. भारतीय क्रिकेटसाठी त्यांची भूमिका अजूनही किती महत्त्वाची आहे, हे यंदाच्या विश्वचषकातून सिद्ध झाले,” असे गांगुली म्हणाले.

“विश्वचषक स्पर्धा आणि द्विदेशीय मालिका यात खूप फरक आहे. विश्वचषकात खेळताना खेळाडूंवर वेगळेच दडपण असते. एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघ जेतेपदापासून दूर राहिला असला, तरी त्यांची संपूर्ण स्पर्धेतील कामगिरी उत्कृष्ट होती. आता सहा-सात महिन्यांत अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या स्पर्धेतही भारतीय संघ सर्वोत्तम कामगिरी करेल अशी मला आशा आहे,” असेही गांगुली यांनी म्हटले.

हे ही वाचा:

महुआंच्या चौकशीचा अहवाल ४ डिसेंबरला लोकसभेत सादर होणार

२०२८मधील सीओपी यजमानपदासाठी भारत उत्सुक

अबब! मोबाईल नाहीतर अख्खा मोबाईल टॉवरच गेला चोरीला!

बेंगळुरूमधील १५ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!

“रोहित एक उत्तम कर्णधार आहे. तो २०२४च्या ट्वेन्टी२० विश्वचषकापर्यंत भारतीय संघाच्या कर्णधारपदी कायम राहील अशी मला अपेक्षा आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी रोहित आणि विराटने विश्रांती घेतली आहे. त्यांचा हा निर्णय योग्यच आहे,” अशा भावना गांगुली यांनी व्यक्त केल्या.

Exit mobile version