सततच्या ‘खुदाई’ने गोराईकर संतापले! कोट्यवधींचा रस्ता पुन्हा खोदला

प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर लोक कडाडले

सततच्या ‘खुदाई’ने गोराईकर संतापले! कोट्यवधींचा रस्ता पुन्हा खोदला

बोरीवली पश्चिमेकडील गोराई परिसरात सुरू असलेल्या सततच्या रस्ते खोदकामामुळे नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे. काही महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेले सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्ते पुन्हा उकरले जात असल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. “रस्ता पुन्हा खोदायचाच होता तर बनवला कशाला?” असा संतप्त सवाल गोराईकर करत आहेत.

गेल्या वर्षभरापासून गोराई परिसरातील मुख्य रस्ते आणि उपरस्त्यांचे सीसीकरण सुरू होते. त्या काळात नागरिकांना वाहतूक कोंडी, धूळ-प्रदूषण, अस्वच्छता, अपघातांचा धोका आणि मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला. अखेर काही महिन्यांपूर्वी ही कामे पूर्ण झाल्यानंतर अखेर परिसरात सुरळीत वाहतूक होईल, अशी अपेक्षा करत स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र आता नव्याने तयार झालेले रस्ते पुन्हा खोदले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. “तीन महिन्यांपूर्वीच तयार झालेला रस्ता पुन्हा का उकरला जात आहे? आधी नियोजन नव्हते का?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अनेक ठिकाणी रस्ते एकमेकांना जोडताना उंच-खोल पातळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी मातीचे तात्पुरते उतार तयार करण्यात आले असून त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्ते बांधकामादरम्यान कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचेही समोर आले आहे. ज्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे तेथे बॅरिकेड्स नाहीत, रस्ता बंद असल्याची कोणतीही सूचना नाही, पर्यायी मार्ग दर्शवणारे फलक नाहीत. लोखंडी सळ्या, बांधकाम साहित्य, रेती-दगड रस्त्यावरच टाकून दिले जात आहेत. मोठमोठ्या वाहनांची सततची वर्दळ यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

हे ही वाचा:

‘बिन शर्ट’ आंदोलनाप्रकरणी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना अटक

एअर ऍम्ब्युलन्स अपघात: खराब हवामानामुळे मार्ग बदलासाठी केलेला आपत्कालीन कॉल

ड्रॅगनच्या जाळ्यातून महाराष्ट्र देशाला मुक्त करणार

गांधी कुटुंबाने मला ७ महिने भेटच दिली नाही!

या भागातून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच कार्यालयीन वेळेत प्रवास करणारे नागरिक दररोज ये-जा करतात. शाळेच्या बस, बेस्ट बस आणि इतर वाहने यामुळे वाहतूक कोंडी वाढते. त्यातच गोराई हा पर्यटनासाठी प्रसिद्ध परिसर असल्याने शनिवार-रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. अशा वेळी सुरू असलेली खोदकामे स्थानिकांसह पर्यटकांनाही त्रासदायक ठरत आहेत.

कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते काही महिन्यांतच पुन्हा उकरले जात असतील, तर या कामांच्या दर्जाबाबत आणि नियोजनाबाबत गंभीर शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. प्रशासनाने या बाबत तात्काळ खुलासा करावा आणि जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Exit mobile version