भारताचं संरक्षण उत्पादन २०४७ मध्ये सहापट वाढून ८.८ लाख कोटी

भारताचं संरक्षण उत्पादन २०४७ मध्ये सहापट वाढून ८.८ लाख कोटी

भारतीय उद्योग परिसंघ (CII) आणि केपीएमजी इंडिया यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालानुसार, भारताचं संरक्षण उत्पादन २०२४-२५ मध्ये असलेल्या अंदाजे १.४६ लाख कोटी रुपयांवरून २०४७ मध्ये सहापट वाढून तब्बल ८.८ लाख कोटी रुपये होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सध्या २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भारताने आपला वार्षिक संरक्षण बजेट ६.८१ लाख कोटी रुपये इतका निश्चित केला आहे. हा खर्च २०४७ पर्यंत ५ पट वाढून ३१.७ लाख कोटी रुपये होण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त केला गेला आहे.

सीआयआयच्या ‘Annual Business Summit 2025’ मध्ये सादर करण्यात आलेल्या या अहवालाचं शीर्षक आहे —
‘आत्मनिर्भर, अग्रणी आणि अतुल्य भारत २०४७: इंडियाज डिफेन्स इंडस्ट्रियल सेक्टर व्हिजन २०४७’

🔹 संरक्षण निर्यातीत १२ पट वाढ

अहवालानुसार, भारताची संरक्षण निर्यात सुद्धा २०२४-२५ मध्ये असलेल्या २४,००० कोटी रुपयांवरून २०४७ मध्ये २.८ लाख कोटी रुपये इतकी होईल, म्हणजेच सुमारे १२ पट वाढ.

🔹 GDP च्या ४.५% पर्यंत संरक्षण खर्च

सध्या भारताचं संरक्षण बजेट GDP च्या सुमारे २% आहे. हा खर्च २०४७ पर्यंत GDP च्या ४.५% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी सध्याचं ४% बजेट ८-१०% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

🔹 मोठ्या सार्वजनिक-खाजगी भागीदारीची गरज

अहवालात म्हटलं आहे की, भारताने २०४७ पर्यंत एक विकसित देश म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मजबूत संरक्षण क्षेत्र आवश्यक आहे. त्यासाठी खासगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देणं, तसेच पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप वाढवणं आवश्यक आहे.

🔹 जागतिक संरक्षण बाजारात भारताचं स्थान

२०३८ पर्यंत भारताने आंतरराष्ट्रीय भागीदारी वाढवावी, जागतिक दर्जाच्या संरक्षण उत्पादनांचा निर्यातीत मोठा वाटा घ्यावा आणि २०४५ पर्यंत कटिंग-एज टेक्नोलॉजीत ग्लोबल लीडर होण्याचं उद्दिष्ट ठेवावं, असंही या अहवालात नमूद केलं आहे.

Exit mobile version