कोलकातामध्ये मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, नऊ जणांचा मृत्यू!

प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू

कोलकातामध्ये मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, नऊ जणांचा मृत्यू!

मंगळवारी (२३ सप्टेंबर) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलकाता आणि परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. अनेक भागांत गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने वाहतूक कोलमडली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुर्गापूजेच्या काही दिवस आधीच झालेल्या या अवकाळी पावसाने शहरात हाहाकार माजवला आहे. विविध भागांत पाणी शिरल्याने घरांमध्ये आणि निवासी संकुलांमध्ये पुरासारखी स्थिती निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेले असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.

या पावसामुळे नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून स्थानिक प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू आहे. हवामान खात्याने आणखी पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, अलिपूरमध्ये सकाळी ५.३० वाजेपर्यंत २३९ मिमी पावसाची नोंद झाली, जी सकाळी ६.३० वाजेपर्यंत २४७.४ मिमी झाली. आयएमडी बुलेटिनने २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० ते २३ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधीत २४७.५ मिमी पावसाची पुष्टी केली आहे.

कोलकात्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात पावसाची तीव्रता सर्वाधिक होती. कोलकाता महानगरपालिकेने (केएमसी) दिलेल्या माहितीनुसार, काही तासांत गरिया कामदहारी येथे ३३२ मिमी, जोधपूर पार्क येथे २८५ मिमी, कालीघाट येथे २८०.२ मिमी, तोप्सिया येथे २७५ मिमी, बालीगंज येथे २६४ मिमी आणि चेतला येथे २६२ मिमी पाऊस पडला.

पावसाचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. मुसळधार पावसामुळे हावडा स्टेशन यार्ड, सियालदाह साउथ स्टेशन यार्ड, चितपूर नॉर्थ केबिन, अनेक कार शेड आणि सियालदाह यार्डच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले. दुर्गापूजेची तयारी जोरात सुरू असताना, शहरात अशा महत्त्वाच्या वेळी संततधार पाऊस कोसळत आहे.

हे ही वाचा : 

मोदी कमजोर पंतप्रधान म्हणतोय राहुल शक्तिमान

जे विकू ते स्वदेशी, जे विकत घेऊ ते स्वदेशी!

जहीर इकबालने वाचले सोनाक्षी सिन्हाचे राशीफळ

आर्यन खानच्या मालिकेतील रणबीर कपूरच्या ‘त्या’ दृश्यावर कारवाईचे आदेश

दरम्यान, पाणी साचल्यामुळे दुर्गापूजेसाठी उभारण्यात येत असलेल्या मंडपांच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच, उत्सवाच्या बाजारपेठाही ओल्या झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

Exit mobile version