एकनाथ शिंदेंवरील टिप्पणीबद्दल कुणाल कामराला समन्स

महाराष्ट्र विधान परिषदेच्या समितीने हजर राहण्यास सांगितले

एकनाथ शिंदेंवरील टिप्पणीबद्दल कुणाल कामराला समन्स

विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. विधान परिषदेच्या समितीने कुणाल याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह विडंबनात्मक गाणे आणि टिप्पणी केल्याबद्दल समन्स बजावले आहे. सुनावणीसाठी समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल विनोदी कलाकार कुणाल कामरा आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना सुनावणीसाठी बोलावले. विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष भाजपचे प्रसाद लाड आहेत. त्यांनी सांगितले की, कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांना १५ दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार, गुरुवारी दुपारी २ वाजता सुनावणीसाठी समितीसमोर हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.

कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे हे दोनदा समन्स बजावल्यानंतरही हजर राहिले नाहीत तर समिती त्यांच्याविरुद्ध कारवाईचा निर्णय घेईल. भाजप विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी शिवसेना नेते शिंदे यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा यांनी एका विडंबनात्मक गाणे रचले होते. ज्यामध्ये त्यांनी शिंदे यांचे नाव न घेता त्यांना देशद्रोही म्हटले होते. सुषमा अंधारे यांनी कुणाल कामरा यांना पाठिंबा दिला होता.

हे ही वाचा:

मुंबई पुणे संथगती मार्ग; टँकर उलटल्याने १८ तास वाहतूक रखडली

अमेरिकेच्या टॅरिफ कपातीचा भारताला मोठा फायदा

कोरियन गेमिंग ऍपचा प्रभाव? तीन बहिणींनी केली आत्महत्या

‘काँग्रेसच्या नैतिकतेने आता तळ गाठलाय!’

कुणाल कामरा- एकनाथ शिंदे वाद काय आहे?

मार्च २०२५ मध्ये कुणाल कामरा याने मुंबईत एक स्टँड- अप शो केला. त्यात त्याने “दिल तो पागल है” या गाण्याचे विडंबन केले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. त्यांच्या विडंबनात्मक गाण्यात कामरा यांनी शिंदे यांना देशद्रोही म्हटले. यामुळे मोठा गोंधळ उडाला. शिवसेनेच्या युवा सेनेने चित्रीकरण झालेल्या स्टुडिओची तोडफोड केली. पोलिसांनी कामरा याच्याविरुद्ध खटले दाखल केले, परंतु त्याला उच्च न्यायालयातून दिलासा मिळाला. दरम्यान, ठाकरे गटाने त्याला पाठींबा दिला.

Exit mobile version