पृथ्वीराज चव्हाण तहव्वूर राणासाठी आले धावून!

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा सल्ला

पृथ्वीराज चव्हाण तहव्वूर राणासाठी आले धावून!

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला काल (१० एप्रिल) भारतात आणल्यानंतर कोर्टात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली. एनआयए पथकाकडून पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे. याच दरम्यान, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तहव्वुर हुसेन राणा याच्याबाबत मोठी मागणी केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष सुनावणी झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. कसाबप्रमाणेच त्यालाही न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित सर्व सुविधा पुरवल्या पाहिजेत. या देशात कांगारू कोर्ट चालणार नाही कारण संपूर्ण जग भारताकडे पाहत आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

एनएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले, तहव्वुर राणाला भारतात आणण्यात आले ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर संपूर्ण कायदेशीर कारवाई केली जाईल, खटला चालवला जाईल आणि कायद्यानुसार त्याला शिक्षा केली जाईल.

या घटनेचे सूत्रधार म्हणून मुंबई पोलिसांनी तहव्वुर राणा आणि डेव्हिड कोलमन हेडली यांची नावे अमेरिकन सरकारला दिली होती. हे दोघे सर्व कंट्रोल करत होते. त्यानंतर ऑक्टोंबर २००९ मध्ये अमेरिकन सरकारने दोघांनाही शिकागो येथून अटक केली. त्यानंतर अमेरिकेत खटला सुरू होता.

हे ही वाचा : 

“ती म्हणाली – ‘उफ्फ!’ आणि जगाने पाहिलं, प्रेमाला रंग असतो!”

चीनचा पलटवार; अमेरिकन वस्तूंवरील करात १२५ टक्क्यांपर्यंतची वाढ

कोहलीला बोल्ड करणारा हा बाहुबली कोण?

उन्हाळ्यात थंडाव्यासाठी खा खरबुज!

ते पुढे म्हणाले, “भारताने पूर्ण पुरावे सादर केले आहेत. हेडलीचीही चौकशी करण्यात आली आहे. पण तहव्वुर राणाने आपला गुन्हा कबूल केलेला नाहीये. तर डेव्हिड कोलमन हेडलीने आपला गुन्हा कबूल केला आहे. अमेरिकन सरकारने हेडलीला साक्षीदार बनवण्याचा निर्णय घेतला आणि ड्रग्ज तस्करीसारख्या कारवायांना आळा घालण्यासाठी त्याला त्यांच्या ड्रग्ज एनफोर्समेंट एजन्सी (DEA) मध्ये सामील केले. त्याला अमेरिकन सरकारकडून पगार मिळतो, त्यामुळे त्याला भारतात पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”

२००९ पासून खूप मोठ्या लढाईनंतर, आता २०२५ मध्ये, दोघांपैकी एकाला परत आणण्यात आले आहे. एनआयए अमेरिकेत गेली आणि त्याला ताब्यात घेऊन भारतात आणले आणि तुरुंगात टाकले. त्याच्या खटल्याची सुनावणी होईल. आम्ही मागणी करतो की, ज्याप्रमाणे कसाबला भारतीय कायद्यांनुसार निष्पक्ष खटला चालवण्याचा, त्याला त्याची बाजू मांडण्याचा आणि वकील नियुक्त करण्याचा अधिकार देण्यात आला. त्याने वकील घेतला, त्याला उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची संधी देण्यात आली आणि यानंतर त्याला शिक्षा झाली.

त्याचप्रमाणे जेव्हा राणाचा खटला चालवला जाईल तेव्हा त्याला देखील तसेच कायदेशीर अधिकार दिले पाहिजेत आणि यानंतर जी शिक्षा होईल ती स्वीकारावी लागेल. आपल्या देशात कांगारू कोर्ट चालणार नाही. एक अपघात झाला आहे, त्याने गुन्हा केला आहे, त्याची जबाबदारी निश्चित करावी लागेल. त्याला भारतीय कायद्यानुसार शिक्षा भोगावी लागेल आणि मला वाटते की हे घडेल. आपल्या देशात कांगारू कोर्ट चालणार नाही, कारण संपूर्ण जग या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. भारतीय कायद्यांनुसार खटला निष्पक्षपणे चालवला जाईल. या कामात सहभागी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे मी अभिनंदन करतो, असे चव्हाण म्हणाले.

Exit mobile version