वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सीचा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (२५ सप्टेंबर) दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पॉड टॅक्सी संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे यांना सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरीक्त आयुक्त अश्विन मुदगल, पोलिस महानिरीक्षक अनिल कुंभारे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
परिवहन सेवेचे पुढचे पाऊल म्हणून ‘पॉड टॅक्सी’ असून कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या बीकेसी मध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. या भागात वर्दळ वाढणार असून या नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्यासाठी पॉड टॅक्सी चांगला पर्याय असणार आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
देशातील हा एकमेव प्रकल्प ठरणार असून त्याला मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावे आणि प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी, असेही शिंदे यांनी संगितले. पॉड टॅक्सीसाठी वांद्रे ते कुर्ला या ८ किमी अंतरामध्ये ३३ स्थानके आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यावर खासगी वाहनधारकांची संख्या कमी होण्यास मदत होईल आणि पर्यायाने रस्त्यावरची वाहतूक देखील कमी होण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले.
पॉड टॅक्सीमुळे मुंबईकरांना मिळणार ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ची नवी सोय
२२ तारखेला, मुंबई येथील प्रस्तावित ‘पॉड टॅक्सी सेवे’संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली होती. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वाढत्या शहरीकरणामुळे सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला बळकटी देणे आवश्यक असून, नागरिकांना ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ मिळणे ही काळाची गरज आहे. या दृष्टीने ‘पॉड टॅक्सी सेवा’ ही पुढील महत्त्वाची पायरी ठरणार असून, ती लवकरच नागरिकांच्या सेवेत आणावी.
हे ही वाचा :
वडील व आजोबांचा खून करून तरुणाची पोलिसांकडे आत्मसमर्पण!
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब तर आदित्य ठाकरेंचा ‘सर्जिकल स्ट्राइक’
पंतप्रधान मोदींची राजस्थानला ₹१.२२ लाख कोटींच्या प्रकल्पांची भेट!
प्रकल्पाचे महत्त्व :
कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये पॉड टॅक्सी सेवा कार्यान्वित करण्याचे नियोजन.
या भागात भविष्यातील बुलेट ट्रेन स्टेशन आणि मुंबई उच्च न्यायालयाचे स्थलांतर लक्षात घेता प्रवासी वर्दळ वाढणार. तसेच विद्यमान परिवहन व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी पॉड टॅक्सी हा पर्याय उपयुक्त ठरणार आहे.
