दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरण प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. यानंतर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे, कारण देश त्याच्या न्यायव्यवस्थेच्या ताकदीमुळे सुरळीतपणे चालतो, असे अण्णा हजारे म्हणाले.
“आपला देश त्याच्या न्यायिक आणि सुरक्षा व्यवस्थेच्या बळावर चालतो. विविध पक्ष, जाती, धर्म आणि समुदाय असलेले इतके मोठे राष्ट्र असूनही, न्यायव्यवस्थेमुळे ते सुरळीतपणे काम करते. त्याशिवाय अराजकता आणि अशांतता निर्माण झाली असती. आता न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची चूक नसल्याचा निकाल दिला आहे, तो मान्य केला पाहिजे,” असे अण्णा हजारे म्हणाले.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतर २१ जणांना दोषमुक्त केले, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने म्हटले की सीबीआय या धोरणामागील कोणतेही “मोठे कट किंवा गुन्हेगारी हेतू” स्थापित करण्यात अपयशी ठरले आहे. या प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेल्यांमध्ये तेलंगणा जागृतीच्या अध्यक्षा के कविता यांचाही समावेश होता, ज्यांनाही दिलासा देण्यात आला.
हे ही वाचा:
पाकिस्तान- अफगाणिस्तानमध्ये सलोखा घडवण्यासाठी इराण इच्छुक!
पाच वर्षांचा मुलगा शाळेच्या बसमध्ये झोपला आणि सात तास अडकून पडला
कोलकातामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
केजरीवाल, सिसोदिया यांना दिल्ली कोर्टाने ठरवले निर्दोष
दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात मोठा दिलासा मिळाल्यानंतर शुक्रवारी माध्यमांशी बोलताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले. “मी भ्रष्ट नाही. न्यायालयाने म्हटले आहे की केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे प्रामाणिक आहेत,” असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तर, या आदेशावर प्रतिक्रिया देताना सिसोदिया म्हणाले की, या निर्णयामुळे जनतेचा संविधानावरील विश्वास पुन्हा दृढ झाला आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की या निकालामुळे पक्षाच्या दीर्घकाळापासून असलेल्या भूमिकेला पुष्टी मिळाली आहे की या खटल्यात योग्यता नाही.
