महाराष्ट्रातील युवक ज्याची प्रतीक्षा करत होते, ती पोलिस भर्ती आता होणार आहे. तब्बल १५ हजार पोलिसांची ही भर्ती असून त्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी भर्ती आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल १५ हजार पोलीसांच्या भर्तीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पोलिस दलात तब्बल १५ हजार नवीन भरतींना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवार १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मंत्रिमंडळाने आणखी चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.
राज्याच्या पोलीस दलात सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली आणि २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहेत. पाच प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार असून लवकरच त्याची जाहिरात प्रकाशित होण्याची शक्यता आहे.
भरण्यात येणारी पदे अशी
– पोलीस शिपाई – १० हजार ९०८
– पोलीस शिपाई चालक – २३४
– बॅण्डस् मॅन – २५
– सशस्त्री पोलीस शिपाई – २३९३
– कारागृह शिपाई – ५५४
हे ही वाचा:
टॅरिफ वादात कंबरडे मोडणार अमेरिकेचेच!
भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार समझोता चर्चेत अजूनही सहभाग
आपला कपट लाजिरवाणा, इजरायली राजदूत असे का म्हणाले ?
गोवा पोलिसांच्या ७०० कर्मचाऱ्यांची पासिंग आउट परेड
पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई ही पदे गट क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.
भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण आणि खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी, तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्य सरकारने घेतलेले काही निर्णय
- अन्न, नागरी पुरवठा विभाग – राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.
- विमानचालन विभाग – सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता निधी देण्याचा निर्णय.
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.
- गृह विभाग – महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे १५ हजार पोलिस भरतीस मंजुरी.
पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी काय करणे गरजेचे?
पोलीस भरतीची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच सज्ज व्हायला हवे. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत, या तिन्ही टप्प्यांसाठी सखोल तयारी करणे गरजेचे आहे. तसेच, भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया नीट तपासावी. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे.
