दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मॅनहोल प्रकरणी आमदार अतुल भातखळकर यांची मागणी

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मुंबईतील साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय अस्लम इसाक शेख यांचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. निष्काळजीपणामुळे एका निष्पाप नागरिकाचा जीव गेल्याचा आरोप करत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दोषींवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी सभागृहात केली.

“मॅनहोलमध्ये पडून मृत्यू होण्याच्या घटना नव्या नाहीत. प्रत्येक वेळी चौकशीची घोषणा होते; मात्र निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडतात. या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी मागणी त्यांनी केली.


हे ही वाचा:
मोदींच्या नेतृत्वाचे शशी थरूरांकडून पुन्हा कौतुक

किंमत वाढलीच नाही, मग दरकपात कशासाठी? 

वैभवला संधी मिळावी, पण कोणालाही वगळून नाही!

अभिषेक शर्माची विक्रमी फटकेबाजी

दरम्यान, या घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका होत असताना महापौर रितू तावडे यांनीही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले. साकीनाक्यात मॅनहोलवर सुरक्षेसाठी जाळ्या बसविण्याचे काम सुरू असताना आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “वॉर्ड अधिकारी आणि संबंधित अभियंत्यांची ही गंभीर चूक आहे. भर पावसात अशी कामे हाती घेण्याची गरज नव्हती. जर अधिकारी अशाच प्रकारे निष्काळजीपणा करत असतील तर चेंबूरप्रमाणेच कठोर निलंबनाची कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. वारंवार सूचना देऊनही प्रशासनातील काही अधिकारी जबाबदारीने काम करत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

या संपूर्ण प्रकरणावर विधानसभेत निवेदन करताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर कठोर भूमिका घेत मोठ्या कारवाईची घोषणा केली. प्रथमदर्शनी संबंधित काम करताना आवश्यक सुरक्षेची काळजी घेण्यात गंभीर त्रुटी झाल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये एल विभागाचे सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर, सहाय्यक दुय्यम अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजित चौगुले आणि महाराष्ट्र प्रदेशचे सहाय्यक अभियंता उत्तम पाटील यांचा समावेश आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करणे अपेक्षित असलेले काम पावसाळा सुरू झाल्यावर करण्यात आले आणि त्यातही सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

याशिवाय संबंधित काम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधातही सुरक्षेची आवश्यक उपाययोजना न केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मुंबईतील सर्व मॅनहोलची येत्या आठ दिवसांत तातडीने तपासणी करण्याचे निर्देश सर्व अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि २६ परिमंडळांतील सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेची कार्यपद्धती, पावसाळी पूर्वतयारी आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता दोषींवर प्रत्यक्षात किती कठोर कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version