राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आयएसआयएस व इतर दहशतवादी संघटनांशी संबंधित मोठ्या दहशतवादी कटाचा भांडाफोड करत मंगळवारी भारतातील ५ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात २१ ठिकाणी छापे टाकले. एनआयएने बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत तसेच जम्मू–काश्मीर केंद्रशासित प्रदेशात मिळून २१ ठिकाणी व्यापक शोधमोहीम राबवली. या दरम्यान अनेक डिजिटल उपकरणे, मोबाईल फोन्स आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली.
ही कारवाई अखलाथुर उर्फ मोहम्मद अखलक मुजाहिद या व्यक्तीच्या अटकेनंतर सुरू झाली. त्याने भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी इतरांसोबत मिळून कट रचल्याचा आरोप आहे. या कटाचा उद्देश प्रतिबंधित दहशतवादी संघटनांसोबत मिळून भारताविरुद्ध जिहाद छेडण्यासाठी लोकांची भरती करणे आणि भौतिक सहाय्य उभारणे हा होता. एनआयएच्या तपासानुसार, आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता. त्याचे पाकिस्तान व सीरिया येथे कार्यरत असलेल्या काही संघटनांशीही संबंध उघड झाले आहेत.
हेही वाचा..
हिंसक निदर्शनांनंतर नेपाळचे पंतप्रधान ओली यांचा राजीनामा
“कर्नाटकातील ईद मिलाद मिरवणुकीत पाकिस्तान समर्थक घोषणा”
बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मोटारीची धडक, पोलीस हवालदाराचा मृत्यू!
यापूर्वीही सोमवारी एनआयएने ५ राज्ये आणि जम्मू–काश्मीरमध्ये २२ ठिकाणी छापेमारी केली होती. त्यात जम्मू–काश्मीरमधील ९ ठिकाणी संशयितांच्या ठिकाणी झडती घेण्यात आली. हे सर्व संशयित परदेशात सक्रिय असलेल्या नेटवर्कशी जोडलेले असल्याचा संशय आहे. हे छापे राज्य पोलीस दल आणि सीआरपीएफच्या सहकार्याने टाकण्यात आले. ही चौकशी तरुणांची भरती, निधी उभारणी आणि देशातील विविध भागांत बेकायदेशीर कारवाया करण्यासाठी स्लीपर सेल स्थापन करण्याशी संबंधित आहे.
एनआयए २२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन मैदानात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचीही चौकशी करत आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा हल्ला करणारे तीन पाकिस्तानी दहशतवादी ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत ठार मारले गेले. त्यांची ओळख सुरक्षा दलांनी जप्त केलेल्या मोबाईल फोनमधील छायाचित्रांच्या आधारे पटली. एनआयएने अलीकडच्या महिन्यांत दहशतवादी मॉड्यूल्स उद्ध्वस्त करण्यासाठी आणि त्यांच्या रसदपुरवठ्यावर गदा आणण्यासाठी प्रयत्न अधिक गतीने सुरू केले आहेत.
