राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय?

मेट्रो, भुयारी मार्ग, बुलेट ट्रेन याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी केल्या मोठ्या घोषणा

राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी राज्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. ग्रामीण भाग, शहरे यासाठी भरीव घोषणा जाहीर केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे देवेंद्र फडणवीस यांनी वित्त खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून मुंबईसाठीही विविध घोषणा करण्यात आल्या.

जानेवारीत झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातून मुंबईला काय मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई शहरासाठी विविध घोषणा केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत १४० अब्ज डॉलर्सपासून ३०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ठाणे तलासरी मार्गाचे काम २०२७ अखेरपर्यंत पूर्ण होईल. अटलबिहारी वाजपेयी अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करण्यात येईल आणि वाढवण जिल्हा, पालघर येथे चौथी मुंबई विकसित करण्यासाठी लॉजिस्टिक आणि विकास केंद्रे निर्माण करण्यात येतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मेट्रो मार्गांसंबंधी देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबई ते नवी मुंबई विमानतळ जोडणारा मेट्रो ८ यासाठी २२ हजार ८६२ कोटी किंमतीचा प्रकल्प उभारणार. वडाळा ते गेट ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका ११ यासाठी २३ हजार ४८७ कोटी किंमतीचा भूमिगत प्रकल्प उभारणार असून या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्विकास प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगर स्थानक आणि वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याची योजना असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड भूयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून ठाणे ते बोरिवली या १८ हजार ८३८ कोटींच्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. याशिवाय वांद्रे वरळी सागरी सेतू ते बुलेट ट्रेन स्थानक, वांद्रे कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भूयारी मार्गाने जोडण्यात येईल.

हे ही वाचा:

‘लाडकी बहिण योजना’ सुरूच राहणार!

बळीराजाला दिलासा! पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत २ लाखांपर्यंतची कर्जमाफी

अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार

कर्नाटकमध्ये १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मुंबईतील २० लाख घरांच्या पुनर्विकासासाठी तसेच भाडे तत्वावरील घरांसह १० लाख घरे विकसित करण्यासाठी बृहन्मुंबई आराखडा तयार करण्यात येईल. मुंबई महापालिका क्षेत्रात नवी झोपडपट्टी उभी राहणार नाही यासाठी GIS आधारे मॅपिंगचा वापर करून No New Slum Framework विकसित करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्यासाठी छेडा नगर ते आनंद नगर आणि आनंद नगर ते साकेत, ठाणे उन्नत मार्गाचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू या मार्गाचे चारही टप्प्यातील काम प्रगतीपथावर असून हा प्रकल्प मे २०२८ पर्यंत पूर्ण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. अटल सेतू ते मुंबई कोस्टल मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी मार्ग या रस्त्यावर सिग्नलविरहित वाहतुकीसाठी शिवडी-वरळी उन्नतमार्गाचे काम प्रगतीपथावर असून ते काम सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रूतगती मार्ग जोडणारा १ हजार १०२ कोटी किंमतीचा उन्नत मार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Exit mobile version